Gautami Patil On Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत असतानाच, प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिनेदेखील आपल्या लाडक्या नेत्याबद्दल अत्यंत भावुक प्रतिक्रिया दिली आहे.
आईने दिली निधनाची बातमी
'अभिजात मराठी ओटीटी'ला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने या घटनेवर शोक व्यक्त केला. तिने सांगितले की, 28 जानेवारी रोजी झालेल्या त्या भीषण विमान अपघाताची बातमी जेव्हा तिच्या आईने तिला दिली, तेव्हा तिचा क्षणभर विश्वासच बसला नाही. "दादांच्या बाबतीत असं काही घडेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. ही बातमी ऐकून मला खूप मोठा धक्का बसला आहे," असे गौतमी म्हणाली.
हेही वाचा - Ankita Walawalkar Post: ‘सुनेत्रा पवार यांनी शपथ घेणं म्हणजे दुःख…’ अंकिता वालावलकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत
न पाहता दिलेला तो पाठिंबा...
विशेष म्हणजे, गौतमीची अजित पवारांशी कधीही प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मात्र, कलाकारांना दादांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना ती म्हणाली, "मी दादांना कधीच भेटले नाही किंवा आमचं बोलणंही झालं नाही. पण तरीही त्यांनी माझ्याबद्दल जे दोन शब्द समर्थनाचे काढले होते, ते माझ्यासाठी खूप मोलाचे होते. प्रत्यक्ष भेट झाली नसली, तरी त्यांनी नेहमीच कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली होती."
"महाराष्ट्र दादांना कधीच विसरणार नाही"
दरम्यान, अजित पवारांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना गौतमी पुढे म्हणाली की, "दादांकडे कोणीही कामासाठी गेले की ते काम पूर्ण होणारच, असा एक दांडगा विश्वास लोकांमध्ये होता. त्यांनी केवळ माझेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले होते. ते नेहमीच 'नंबर वन' नेते होते आणि राहतील. महाराष्ट्र त्यांना कधीच विसरू शकणार नाही."