नवी दिल्ली: बॉलिवूडमधील ज्येष्ठ पार्श्वगायक उदित नारायण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नी रंजना यांनी बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील महिला पोलीस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे. वैद्यकीय उपचाराच्या बहाण्याने त्यांच्या संमतीशिवाय गर्भाशय काढण्यात आल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.
माध्यमांतील माहितीनुसार, रंजना आपल्या वकिलांसह महिला पोलीस ठाण्यात गेल्या आणि अधिकृत अर्ज सादर केला. तक्रारीत त्यांनी उदित नारायण यांच्यासह त्यांच्या दोन भावांवर आणि दुसऱ्या पत्नीवर आपराधिक कट (Criminal Conspiracy) रचल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार जवळपास तीन दशकांपूर्वी घडल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
रंजनांच्या म्हणण्यानुसार, 7 डिसेंबर 1984 रोजी हिंदू विधीनुसार त्यांचे उदित नारायण यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर 1985 मध्ये गायक कारकिर्दीसाठी ते मुंबईला गेले. पुढे माध्यमांतून त्यांना त्यांच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भात विचारणा केल्यावर त्यांना वारंवार दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा: Gold-Silver Price : भारत बंदाचा थेट परिणाम; सोन्याच्या किमतीत जबरदस्त वाढ, 10 ग्रॅमचा भाव किती?
1996 मध्ये उपचाराच्या कारणास्तव दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यावेळी त्यांच्या माहितीशिवाय शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे रंजनांचे म्हणणे आहे. पुढील वैद्यकीय तपासणीदरम्यान अनेक वर्षांनी त्यांना गर्भाशय काढण्यात आल्याची माहिती मिळाली, ज्यामुळे त्या मानसिकदृष्ट्या हादरल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच 2006 मध्ये मुंबईत गेल्यावर त्यांना घरात प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर त्या माहेरी राहत असल्याचे सांगितले जाते. “मला न्याय हवा आहे. वारंवार आश्वासने दिली जातात, पण ती पूर्ण होत नाहीत,” असे रंजनांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
दरम्यान, महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तक्रार प्राप्त झाल्याची खात्री केली असून, आरोपांतील घटना जुन्या असल्याने तपास सुरू असल्याचे सांगितले. प्राथमिक चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्यात येणार आहे. सध्या प्रकरण तपासाधीन असून सर्व बाजूंची मते समोर आल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: BMC Mayor Action Plan: शाळांमध्ये संविधानाची मूल्ये आणि टँकर मुक्त मुंबई; मुंबईच्या नव्या महापौर रितू तावडे यांचे 'मिशन व्हिजन' जाहीर