अनंतनाग:अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद आणि त्याच्या समर्थन करणाऱ्या नेटवर्क्सवर प्रभावी कारवाई करण्यासाठी लष्कर, सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात शोध व घेराव मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. अलिकडच्या पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर, ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
या मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्यातील विविध ठिकाणी असंख्य छापे टाकण्यात आले असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत सुमारे 175 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये दहशतवादी गटांना सहकार्य करणाऱ्यांचा समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी अतिरिक्त मोबाईल वाहन तपासणी बिंदू (एमव्हीसीपी) स्थापन करण्यात आले आहेत. तसेच, मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा तपासण्या वाढवण्यात आल्या आहेत. संशयित व्यक्ती व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
हेही वाचा:सिंधू नदी आमचीच राहील; नाहीतर रक्त वाहील: बिलावल भुट्टोंची पोकळ धमकी
विशेषतः जास्त घनतेच्या जंगली भागात, दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन्स (सीएएसओ) राबवण्यात येत आहेत. यासोबतच, संभाव्य दहशतवादी हालचालींना अटकाव करण्यासाठी अॅम्ब्यूश आणि नियमित गस्त वाढवण्यात आली आहे.
अनंतनाग पोलीस आणि भागीदार सुरक्षा दल, जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहेत. कोणत्याही प्रकारची अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा दिवस-रात्र सतर्क आहेत.
पोलिसांनी जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा माहिती असल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक सहकार्यानेच जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम राहू शकते, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या या कठोर कारवाया दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना मोठा धक्का देणाऱ्या ठरत आहेत. जिल्ह्यातील सामान्य जनतेला सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण देण्यासाठी प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा पूर्ण ताकदीने प्रयत्नशील आहे.