Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि विश्वचषक विजेते कर्णधार इम्रान खान (Imran Khan) यांच्या बिघडत्या प्रकृतीबद्दल जागतिक क्रिकेट जगतातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह जगातील 14 माजी कर्णधारांनी एकत्र येत पाकिस्तान सरकारला एक विशेष पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी इम्रान खान यांना तुरुंगात योग्य वागणूक आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आवाहन केले आहे.
प्रकृतीबाबत गंभीर चिंता आणि संयुक्त निवेदन
दरम्यान, 17 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या संयुक्त निवेदनात दिग्गजांनी इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत, विशेषतः त्यांच्या खालावणाऱ्या दृष्टीबाबत (Deteriorating Eyesight) गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये केवळ भारतीयच नव्हे, तर जगातील महान क्रिकेटपटूंचा समावेश आहे. यामध्ये मायकेल आथर्टन, अॅलन बॉर्डर, ग्रेग चॅपेल, इयान चॅपेल, बेलिंडा क्लार्क, डेव्हिड गॉवर, नासेर हुसेन, क्लाइव्ह लॉयड, स्टीव्ह वॉ आणि जॉन राईट यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
1992 च्या विश्वचषकातील ऐतिहासिक योगदानाची आठवण
या माजी कर्णधारांनी आपल्या पत्रात इम्रान खान यांच्या खेळातील अतुलनीय योगदानाचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, "इम्रान खान यांनी 1992 च्या क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानला मिळवून दिलेला ऐतिहासिक विजय हा केवळ कौशल्याचा नाही, तर त्यांच्या नेतृत्वाचा आणि धैर्याचा पुरावा होता. त्यांच्या या कामगिरीने सीमारेषा ओलांडून अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे." आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्याविरुद्ध क्रिकेट खेळले असून, त्यांच्या अष्टपैलू क्षमतेचा आम्हा सर्वांना आदर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा - India vs Australia Women 2026 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाला मिळणार मोठं बळ; दुखापतीनंतर 'या' वादळी फलंदाजाची एन्ट्री
निष्पक्ष वागणूक आणि आदराची मागणी
पत्रात पुढे असे म्हटले आहे की, इम्रान खान हे केवळ क्रिकेटपटू नसून त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणूनही कार्य केले आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या एका माजी राष्ट्रप्रमुखाला आणि जागतिक क्रीडा आयकॉनला मिळायला हवा तसा सन्मान आणि आदर त्यांना मिळावा. क्रिकेट हा निष्पक्ष खेळाचे (Fair Play) मूल्य शिकवतो, त्याच मूल्याचा विचार करून पाकिस्तान सरकारने इम्रान खान यांच्या आरोग्याकडे आणि सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.