नवी दिल्ली: सामूहिक बलात्काराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणात, प्रत्येक आरोपीला दोषी ठरवण्यासाठी प्रत्येकाने केलेल्या संपूर्ण बलात्काराच्या कृत्याचे ठोस पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही. तसेच जरी बलात्कार एका व्यक्तीने केला असला तरी, त्या कृत्यात सहभागी असलेल्या इतर लोकांनाही जबाबदार धरले पाहिजे आणि त्यांना समान शिक्षा दिली पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
आरोपीने दाखल केली याचिका -
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने एका आरोपीची याचिका फेटाळताना हा निर्णय दिला आहे. पीडितेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये इतर आरोपींसोबत त्याचे नाव नमूद नसल्याचा दावा आरोपीने केला होता. आरोपीने असा दावा केला होता की, गुन्ह्यात त्याची भूमिका मुख्य आरोपीला मदत करण्यापुरती मर्यादित होती.
हेही वाचा - हातात राफेल विमानाचे खेळणे, लिंबू आणि मिरच्याही टांगल्या…अजय राय यांच्या कृतीनं पेटला वाद
खटल्याची सुनावणी केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आरोपीची याचिका फेटाळून लावत म्हटले की, कलम 376 (2) (जी) अंतर्गत सामूहिक बलात्कार प्रकरणात, एका व्यक्तीने केलेला गुन्हा टोळीतील सर्व सदस्यांना शिक्षा देण्यासाठी पुरेसा आहे. परंतु त्या सर्वांनी हे काम एकाच हेतूने केले असेल. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कलम 376 (2) (ग) अंतर्गत आरोप हाच हेतू सूचित करतो. फक्त समान हेतू दाखवण्यासाठी पुरावे आवश्यक आहेत.
हेही वाचा - पाकिस्तानकडून LOC वर पुन्हा गोळीबार; सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन
सर्व आरोपी गुन्ह्यासाठी दोषी -
आरोपीची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने मागील निकालांचाही हवाला दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2) (जी) अंतर्गत, एकापेक्षा जास्त आरोपींनी एकत्रितपणे गुन्हा केला आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारी वकिलांना पुरावे सादर करावे लागतील. अशा परिस्थितीत, जरी बलात्कार एकाच व्यक्तीने केला असला तरी, सर्व आरोपी या गुन्ह्यासाठी दोषी असतील.