Friday, May 16, 2025 12:36:43 PM

जनरल असीम मुनीरने घडवून आणला पहलगाम हल्ला! माजी पाकिस्तानी सैनिक आदिल रझा यांचा मोठा दावा

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे आदेश पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिले होते, असेही आदिल रझा यांनी म्हटले आहे.

जनरल असीम मुनीरने घडवून आणला पहलगाम हल्ला माजी पाकिस्तानी सैनिक आदिल रझा यांचा मोठा दावा
General Asim Munir
Edited Image

इस्लामाबाद: पहलगाम हल्ला पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी घडवून आणल्याचा दावा माजी पाकिस्तानी सैनिक आदिल रझा यांनी केला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे आदेश पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिले होते, असेही आदिल रझा यांनी म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला होता. पहलगामला सुट्टीसाठी गेलेल्या पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. घटनेनंतरच्या प्राथमिक तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे उघड झाले.

आदिल रझा यांनी काय दावा केला?

आदिल रझा यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील उच्चपदस्थ सूत्रांकडून आता पुष्टी झाली आहे की पहलगाम दहशतवादी हल्ला जनरल असीम मुनीर यांच्या आदेशावरून करण्यात आला होता, तर संपूर्ण पाकिस्तानला या भ्याड हल्ल्याची माहिती नाही.' तथापी, दुसऱ्या ट्विटमध्ये रझा यांनी लिहिले की, 'पहलगाम दहशतवादी हल्ला हा फॅसिस्ट असीम मुनीर आणि त्याच्या सैन्यातील साथीदारांनी त्यांचे वैयक्तिक हितसंबंध पूर्ण करण्यासाठी केलेले एक वैयक्तिक कृत्य होते. म्हणून, कोणत्याही एका बदमाश घटकाच्या कृतींसाठी पाकिस्तानवरील लष्करी ताबा जबाबदार धरता येणार नाही.' 

हेही वाचा - पाकिस्तानला आणखी एक झटका! पाकिस्तानी नागरिकांना 4 दिवसांत सोडावा लागेल भारत; व्हिसा सेवा तात्काळ बंद

भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी हवाई हद्द बंद - 

दरम्यान, गुरुवारी पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र आणि वाघा सीमा बंद केली. पाकिस्तानने भारतासोबतचा सर्व व्यापारही स्थगित केला. तसेच सिंधू जल कराराअंतर्गत पाकिस्तानला मिळणारे पाणी रोखण्याचा किंवा वळवण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाचा निर्णय असेल, असंही पाकिस्तानने म्हटलं आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर अनेक घोषणा करण्यात आल्या. 

हेही वाचा -  काहीतरी मोठं घडणार...? भारत-पाक सीमेवर अलर्ट! लष्करप्रमुख उद्या श्रीनगरला भेट देणार

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कठोर कारवाईच्या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी सरकारच्या प्रमुख मंत्र्यांसोबत आणि तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (एनएससी) बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला कोणत्याही धोक्याला सर्व प्रकारे जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. 


सम्बन्धित सामग्री