नवी दिल्ली: पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आणि लोकांच्या क्रूर हत्येनंतर मोदी सरकार पाकिस्तानला सतत नवीन झटके देत आहे. बुधवारी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली आणि त्यात पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे. आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी नागरिकांना कधीपर्यंत भारत सोडावा लागेल याची सविस्तर माहिती दिली आहे.
27 एप्रिलपर्यंत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश -
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सीसीएस बैठकीत घेतलेल्या निर्णयांनुसार, भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विद्यमान वैध व्हिसा 27 एप्रिल 2025 पासून रद्द केले जातील.
हेही वाचा - Pahalgam Attack Video: पहलगाम हल्ल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आला समोर; पहा दहशतवाद्यांनी कसा केला नरसंहार
तथापि, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा फक्त 29 एप्रिल 2025 पर्यंत वैध असतील. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानींनी त्यांच्या सुधारित व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी भारत सोडावा.
हेही वाचा - प्रत्येक अतिरेक्याला शोधून ठेचणार; पंतप्रधान मोदी बिहारमध्ये गरजले
पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना परतण्याचा सल्ला -
दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही पाकिस्तानात असलेल्या भारतीयांसाठी कडक सूचना जारी केल्या आहेत. मंत्रालयाने सध्या पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर भारतात परतण्याचा सल्ला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचा कडक सल्ला दिला आहे.