भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मौद्रिक धोरण समितीच्या चालू बैठकीकडे उद्योगजगत आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. तज्ज्ञांच्या मते, धोरणात्मक व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमी असून दर ‘स्थिर’ ठेवले जातील. मात्र, 25 बेसिस पॉइंट्सने कपात झाली, तर ती बाजारासाठी सकारात्मक आणि आश्चर्यकारक बाब ठरेल.
बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ज्ञ सोनल बधन यांनी सांगितले की, जरी RBI ऑक्टोबरमध्ये 25bps कपात केली, तरी FY26 चा GDP अंदाज बदलण्याची गरज नाही. कारण मौद्रिक धोरणातील कोणत्याही पावलांचा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसण्यासाठी साधारण 2 ते 3 तिमाही लागतात.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, RBI कडे सध्या दरकपातीची मर्यादित जागा असल्याने FY26 साठी महागाईचा अंदाज 50bps नी कमी होऊ शकतो, ज्यामुळे रोख्यांच्या परताव्याला काहीसा दिलासा मिळेल. तरीसुद्धा, धोरणात्मक भूमिका ‘न्यूट्रल’च राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीला RBI ने 100bps कपात केली होती. याचा परिणाम कर्जावरील व्याजदरांवर दिसून येत आहे. अनुसूचित व्यावसायिक बँकांचा (SCBs) सरासरी व्याजदर (WALR) 60bps ने कमी झाला आहे. त्याचबरोबर, सार्वजनिक खर्चात वाढ, GST मधील सुधारणा आणि खपाच्या मागणीत हळूहळू वाढ यामुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही RBI बारीक लक्ष ठेवून आहे. भारत-अमेरिका व्यापार करारावर अजूनही चर्चाचर्चा सुरू असल्याने, टॅरिफ्ससंदर्भातील स्पष्टता मिळेपर्यंत RBI धोरण दर बदलण्याची घाई करणार नाही. तसेच देशांतर्गत GST कपातीमुळे सणासुदीच्या काळातील मागणीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
एकूणच, RBI सध्या दर स्थिर ठेवेल अशीच जास्त शक्यता असून 25bps कपात ही बाजारासाठी दिलासा देणारी ठरू शकते. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा बुधवारी सकाळी 10 वाजता बैठकीचा निकाल जाहीर करतील.