नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नू याने भारतीय सैन्यातील शीख सैनिकांना आवाहन केले आहे की, जर भारताने पाकिस्तानशी युद्ध केले तर देशासाठी लढू नका म्हणजेच, भारताच्या बाजूने युद्धात भाग घेऊ नका. पन्नू याला भारताने दहशतवादी घोषित केलेले आहे. त्याच्यावर अनेक खटले दाखल आहेत. त्यांचा एनआयए (NIA) तपास करत आहे.
खलिस्तान फुटीरतावादी संघटना ‘शीख्स फॉर जस्टिस’च्या या नेत्याने असाही दावा केला आहे की, युद्ध झाल्यास सीमेच्या भारतीय बाजूला असलेले पंजाबी पाकिस्तानी सैन्याला ‘लंगर वाटतील’ म्हणजेच, रसद पुरवतील, मेजवानी देतील.
हेही वाचा - दहशतवाद पोसणाऱ्या पाकड्यांच्या आर्थिक नाड्या भारत आवळणार; सिंधू जलकरार स्थगितीनंतर 'हे' दोन हल्ले?
‘जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर ते भारत आणि मोदींसाठी शेवटचे युद्ध असेल. भारतीय बाजूला असलेले पंजाबी पाकिस्तानी सैन्यासाठी लंगर वाटतील,’ असे पन्नू यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे, असे वृत्त पाकिस्तानी वृत्तसंस्था डॉनने दिले आहे.
शीख सैनिकांना दिलेल्या संदेशात पन्नू याने म्हटलंय की, पाकिस्तान हा आपल्यासाठी (खालिस्तानवाद्यांसाठी) शत्रू नाही तर, एक मैत्रीपूर्ण राष्ट्र आहे, जो ‘पंजाब मुक्त केल्यानंतर आपला शेजारी’ असेल.
‘नरेंद्र मोदींच्या राष्ट्राभिमानी युद्धाला नकार देण्याची हीच वेळ आहे. पाकिस्तानविरुद्ध लढू नका. पाकिस्तान तुमचा शत्रू नाही. पाकिस्तान शीख लोकांसाठी आणि खलिस्तानसाठी एक मैत्रीपूर्ण देश असेल आणि राहील. एकदा आपण पंजाब मुक्त केला की, पाकिस्तान आपला शेजारी असेल,’ असे हा फुटीरतावादी पुढे म्हणाला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव
गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरची प्रमुख आणि मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट असलेल्या या शहरात 26 जणांचा मृत्यू झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांना या भ्याड हल्ल्याला देशाच्या प्रत्युत्तराची वेळ, लक्ष्य आणि पद्धत निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. या पार्श्वभूमीवर, गुरपतवंत सिंग पन्नू शीख सैनिकांना चिथावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. शीख आणि पंजाबी लोकांबद्दलचे त्यांचे दावे निराधार आणि निराशेमधून हताशपणे करण्यात आलेले आहेत.
भारताकडून लष्करी कारवाई जवळ आली आहे, असा दावा अनेक पाकिस्तानी मंत्र्यांनी केला आहे. अशा वृत्तांमुळे बुधवारी पाकिस्तानी शेअर बाजार कोसळला. मात्र, भारतीय बाजूने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा - लष्कर-ए-तोयबा, ISI, लष्करानं कट रचला; पहलगाम हल्ल्यावर NIAचा प्राथमिक अहवाल
मार्च महिन्यात खलिस्तान्यांचा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या गाडीसमोर गोंधळ
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर मार्च महिन्यात लंडनमध्ये चॅथम हाऊस थिंक टँकच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते आपल्या कारच्या दिशेने निघाले, त्यावेळी आधीपासूनच तिथे विरोध करणाऱ्या खलिस्तान समर्थकांनी त्यांना पाहून घोषणाबाजी सुरु केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
त्या वेळी, जयशंकर यांची कार अडवण्याचा प्रयत्न झाला. तसेच, तिरंगा झेंडा फाडण्यात आला. खलिस्तान समर्थकांनी जाणीवपूर्वक हे चिथावणीखोर कृत्य केलं होतं. एस. जयशंकर यांनी एका कार्यक्रमात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या POK बद्दल मोठ वक्तव्य केलं होतं.