नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढलेला आहे. काही दिवसांपूर्वी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करत नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली. या कारवाईनंतर पाकिस्तानकडूनही तोफगोळ्यांनी प्रत्युत्तर देण्यात आले. या पार्श्वभूमीवर भारताने आपले ‘S-400’ हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय केली आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. या संदर्भात पाकिस्तानची ‘शाहीन-3’ ही मिसाइल आणि भारताची ‘S-400’ प्रणाली यांच्यातील ताकद कोणती अधिक आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
S-400 काय आहे?
‘S-400 ट्रायम्फ’ ही रशियामधून खरेदी केलेली अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली आहे. भारताने 2018 मध्ये सुमारे पाच अब्ज डॉलरला ही प्रणाली खरेदी केली. S-400 ची रेंज 400 किलोमीटरपर्यंत असून, ती एकाचवेळी 72 टार्गेट्सवर अचूक हल्ला करू शकते. माइनस 70 डिग्री सेल्सियस तापमानातही ही प्रणाली काम करू शकते. युद्धसामग्री, फायटर जेट्स, ड्रोन आणि अगदी बॅलिस्टिक मिसाईल्सलाही S-400 रोखू शकते. यामध्ये बसवलेला रडार अत्यंत प्रगत असून, शत्रूच्या हालचाली वेळीच टिपतो.
शाहीन-3 ची ताकद
पाकिस्तानची शाहीन-3 ही मल्टी-स्टेज, सॉलिड फ्युएलवर चालणारी बॅलिस्टिक मिसाईल आहे. 2750 किलोमीटरची रेंज असलेल्या या मिसाइलचा मुख्य उद्देश भारताच्या अंदमान-निकोबार बेटांपर्यंत पोहोचण्याचा आहे. ही मिसाइल अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. 2022 मध्ये या मिसाइलची चाचणी यशस्वी झाली, आणि त्यानंतर पाकिस्तानने तिला अधिक सक्षम केल्याचे सांगितले.
हेही वाचा:भारत-पाक तणाव वाढला; देशातील काही विमानतळांवरील उड्डाणे रद्द, शाळाही बंद
S-400 की शाहीन-3; कोण वरचढ?
शाहीन-3 जरी लांब पल्ल्याची आणि अण्वस्त्रक्षम असली, तरी ती भारताच्या ‘S-400’ प्रणालीच्या अचूकतेसमोर फारशी टिकू शकत नाही. S-400 ची रडार प्रणाली आणि अॅन्टी-मिसाइल क्षमता इतकी प्रगत आहे की ती शाहीन-3 सारख्या मिसाइललाही आकाशातच निष्प्रभ करू शकते. पाकिस्तानकडे आत्तापर्यंत S-400 सारखी कोणतीही हवाई संरक्षण प्रणाली नाही, हेही महत्त्वाचे आहे.
भारताची S-400 प्रणाली ही केवळ पाकिस्तानच नाही तर चीनसारख्या बलाढ्य देशांपासून संरक्षणासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत आहे. शाहीन-3 ही जरी धोकादायक असली तरी S-400 च्या समोर तिचा प्रभाव मर्यादित आहे. भारताने S-400 तैनात केल्यामुळे त्याच्या सुरक्षेचा स्तर आणखी मजबूत झाला असून, हे पाकिस्तानसाठी निश्चितच चिंता वाढवणारे आहे.