नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध महत्त्वाच्या भागांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीने पावले उचलण्यात आली आहेत. यामध्ये प्रमुख विमान कंपन्यांनी अनेक उड्डाणे रद्द केली असून, सीमावर्ती राज्यांतील शाळा आणि महाविद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहेत.
विमानवाहतूक प्रभावित
भारत सरकारच्या निर्देशानुसार आणि हवाई सुरक्षेच्या दृष्टीने, देशातील काही भागांमध्ये विमान वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
एअर इंडियाने 10 मे रोजी सकाळी 5:29 वाजेपर्यंत जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या 9 शहरांना जाणाऱ्या सर्व उड्डाणांचे संचालन रद्द केले आहे.
इंडिगो या खासगी विमानसेवांनीदेखील 11 शहरांमध्ये उड्डाणे रद्द केली आहेत. या शहरांमध्ये जम्मू, श्रीनगर, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाला, बिकानेर, जोधपूर, ग्वाल्हेर, किशनगड आणि राजकोट यांचा समावेश आहे. इंडिगो दररोज सरासरी 2200 उड्डाणांचे संचालन करते.
दिल्ली विमानतळावर देखील स्थिती गंभीर असून, वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या एकूण २० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांनी विमान कंपन्यांच्या वेबसाईट्स किंवा हेल्पलाईनद्वारे आपली उड्डाण स्थिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा:‘ऑपरेशन सिंदूर’चं ओवैसींकडून कौतुक; टीआरएफविरोधात जागतिक मोहीम राबवण्याची मागणी
शाळा आणि महाविद्यालये बंद
देशातील काही भागांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक संस्था तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पंजाबमधील अमृतसर, पठाणकोट, गुरुदासपूर, फाजिल्का आणि फिरोजपूर येथील सर्व शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.
पठाणकोट जिल्ह्यातील सर्व शाळा पुढील 72 तासांसाठी बंद राहतील, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.
जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ येथील शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बुधवारी पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या.
काश्मीर विद्यापीठाने देखील श्रीनगरमधील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे विद्यापीठ प्रशासनाने कळवले आहे.
राजस्थानमधील जैसलमेर, बारमेर आणि बिकानेर या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये शाळा बंद करण्यात आल्या असून, परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
देशभरातील सुरक्षायंत्रणा सतर्क असून, विशेषतः सीमावर्ती राज्यांमध्ये अधिक कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये मोठे स्फोट झाले असून, यामुळे संपूर्ण देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सद्य:स्थितीत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीची वाट पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.