नवी दिल्ली: भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील ऐतिहासिक व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचताना दिसत असून, या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी रविवारी महत्त्वपूर्ण विधान करत सांगितले की, भारत आणि युरोपने रणनीतिक भागीदारी, संवाद आणि खुलेपणाचा स्पष्ट पर्याय निवडला आहे. या प्रस्तावित कराराला त्यांनी “जगासाठी आशेचा किरण” असे संबोधले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणाऱ्या शिखर वार्तेपूर्वी उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारत-युरोप भागीदारीचा संदेश अधोरेखित केला. “भारत आणि युरोपने एक स्पष्ट निवड केली आहे. रणनीतिक भागीदारी, संवाद आणि खुलेपणा. आपापल्या ताकदीचा योग्य वापर करत परस्पर विश्वास निर्माण करण्याचा हा मार्ग आहे. विभागलेल्या जगाला आम्ही दाखवून देत आहोत की सहकार्याचाही मार्ग शक्य आहे,” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन आणि युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे आज भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. अँटोनियो कोस्टा यांनी भारताला युरोपीय संघाचा अत्यंत महत्त्वाचा भागीदार असल्याचे सांगत, नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे संरक्षण करण्याची सामूहिक जबाबदारी भारत आणि युरोपीय संघ यांच्यावर असल्याचे मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा: Marathi Reel Star Death : लाडक्या माय-लेकाच्या जोडीतील रिलस्टारचं अकाली निधन; चाहत्यांना मोठा धक्का
या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी रविवारी युरोपीय संघाच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. भारत-युरोपीय संघ शिखर परिषद द्विपक्षीय संबंधांमध्ये नव्या पर्वाची सुरुवात ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी त्यांची उपस्थिती आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणाऱ्या चर्चांमधून भारत-युरोपीय संघ संबंधांना नवी दिशा मिळेल,” असे जयशंकर यांनी नमूद केले.
याआधी 20 जानेवारी रोजी दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीतही उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी या प्रस्तावित व्यापार कराराबाबत मोठे विधान केले होते. भारत आणि युरोपीय संघ दोन अब्ज लोकांचा बाजार निर्माण करणाऱ्या आणि जागतिक GDP च्या जवळपास एक चतुर्थांश प्रतिनिधित्व करणाऱ्या ऐतिहासिक कराराच्या उंबरठ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले होते. या कराराला त्यांनी “सर्व करारांची जननी” असे संबोधले होते.
गेल्या काही वर्षांत भारत आणि युरोपीय संघातील संबंध सातत्याने मजबूत झाले आहेत. वस्तू व्यापाराच्या बाबतीत युरोपीय संघ हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील एकूण द्विपक्षीय व्यापार सुमारे 136 अब्ज डॉलर इतका होता. यामध्ये अंदाजे 76 अब्ज डॉलरचा निर्यात व्यापार आणि 60 अब्ज डॉलरचा आयात व्यापार समाविष्ट आहे. हा प्रस्तावित करार अंतिम झाल्यास भारत-युरोपीय संघ संबंधांना आर्थिक, रणनीतिक आणि जागतिक पातळीवर नवे बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Malegaon Blast: मालेगाव हादरलं! प्रजासत्ताक दिनी पोलीस परेड ग्राउंडजवळ भीषण स्फोट; पाच जखमी