कोलंबो: येत्या 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा थरार, म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे.T20 विश्वचषक 2026 च्या या महामुकाबल्यासाठी अवघे काही तास उरले असताना, कोलंबोच्या आकाशात मात्र पावसाचे काळे ढग जमा झाले आहेत. एका बाजूला दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी मैदानात भिडण्यासाठी सज्ज असताना, दुसऱ्या बाजूला 'वरुणराजा' या सामन्याचा निकाल लावणार की काय, अशी धास्ती जगभरातील कोट्यवधी चाहत्यांना लागली आहे.
कोलंबोमध्ये पावसाची टांगती तलवार
कोलंबोच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रविवारी पावसाची 93 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. महत्त्वाचे म्हणजे, या स्पर्धेच्या गट फेरी आणि सुपर-8 फेरीत कोणत्याही सामन्यासाठी 'राखीव दिवस' (Reserve Day) ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पाऊस न थांबल्यास सामन्याची ओव्हर संख्या कमी केली जाईल, मात्र तरीही खेळ शक्य न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देऊन समाधान मानावे लागेल.
हेही वाचा: Weather Alert: राज्यात येणार मोठं संकट! नागरिकांना हवामान खात्याची चेतावणी; महाराष्ट्रातील हवामानात होणार मोठे बदल
सुपर-8 मध्ये जाण्यासाठी 'करो या मरो'ची स्थिती
भारताने आणि पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवून प्रत्येकी चार गुण खात्यात जमा केले आहेत. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट सुपर-8 मध्ये आपली जागा पक्की करणार आहे. नियमानुसार, टी-20 सामन्याचा निकाल लावण्यासाठी दोन्ही डावांत किमान प्रत्येकी पाच षटके होणे अनिवार्य आहे. सामन्यासाठी मैदानाची वेळ वाढवली जाण्याची शक्यता असली तरी, पावसाचा लहरीपणा चाहत्यांचा उत्साह मावळू शकतो.
आकडेवारीचा कल; टीम इंडियाच 'बाहुबली'!
2007 च्या पहिल्या विश्वचषकापासून भारत आणि पाकिस्तान टी-20 विश्वचषकात आतापर्यंत आठ वेळा समोरासमोर आले आहेत. या ऐतिहासिक संघर्षात भारताचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. भारताने पाकिस्तानचा 7 वेळा धुव्वा उडवला आहे, तर पाकिस्तानला केवळ एकदाच विजयाची चव चाखता आली आहे. उद्याच्या सामन्यात हा विजय-विक्रम 9-1 असा करण्यासाठी रोहित शर्माची सेना संपूर्ण ताकद पणाला लावेल.
चाहत्यांच्या नजरा कोलंबोकडे; कोण मारणार बाजी?
आर. प्रेमदासा स्टेडियमचा इतिहास आणि सद्यस्थिती पाहता फिरकी गोलंदाजांना येथे मोठी मदत मिळू शकते. पाकिस्तानचा सराव सामना याआधीच पावसामुळे रद्द झाला असल्याने, त्यांच्यासाठी हा सामना मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असेल. जर पावसाने विश्रांती घेतली, तर फलंदाजीचा जोर आणि गोलंदाजीची धार यामध्ये जो संघ 'संयम' राखेल, तोच या महासंग्रामाचा 'सिकंदर' ठरेल.
हेही वाचा: India Russia Oil Trade: ट्रम्प असो वा बायडेन, भारताचा बाणा ठाम; ऊर्जा खरेदीसाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दाखवला ‘आरसा’