IndiGo Flights Cancellations:देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमानवाहतूक सेवा देणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सचे ऑपरेशनल संकट सातव्या दिवशीही थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी 400 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे हजारो प्रवासी अडचणीत सापडले. गेल्या मंगळवारपासून इंडिगोने तब्बल 4500 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. ही कंपनीच्या इतिहासातील सर्वात गंभीर अडचण मानली जात आहे.
प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द
दिल्ली (IGI) – 134
बंगळुरू – 127
हैदराबाद – 77
चेन्नई – 71
अहमदाबाद – 18
दिल्ली आणि मुंबई विमानतळांवर प्रवाशांना अनेक तास प्रतीक्षा, लांब रांगा, सततचे विलंब आणि शेवटच्या क्षणी उड्डाणे रद्द होण्याचा सामना करावा लागला. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता ही शहरे या संकटाने सर्वाधिक प्रभावित झाली आहेत.
हेही वाचा - Naxal Surrender: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड झोन माओवादीमुक्त; कुख्यात कमांडर रामधेर मज्जीसह 12 माओवाद्यांचे आत्मसमर्पण
सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार
इंडिगोच्या मोठ्या प्रमाणातील फ्लाइट रद्द करण्याच्या संकटावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. मात्र, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यांनी म्हटलं की, 'होय, लाखो प्रवासी अडकले आहेत. अनेकांना तातडीची कामे आहेत… पण केंद्र सरकारने याची दखल घेतली आहे आणि आवश्यक पावले उचलली आहेत. त्यामुळे या क्षणी न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज वाटत नाही.'
हेही वाचा - Sunil Sahu Inspiring Story: दोन्ही हात गमावले, पण जिद्दीच्या जोरावर 18 पदके जिंकणारे सुनील साहू यांचा यशस्वी प्रवास
पायलट संस्थांकडून मदतीचे आवाहन
संकट कमी होत नसल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आता परिस्थिती सुधारण्यासाठी सक्रिय झाले आहे. नियामक संस्थेने देशभरातील पायलट संघटनांना इंडिगोच्या ऑपरेशन्स स्थिर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी डीजीसीएने इंडिगोच्या सीईओसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. खराब नियोजन, संसाधन व्यवस्थापनातील त्रुटी आणि संकट हाताळण्यात आलेल्या कमतरतेवर भर देऊन या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.
प्रवाशांचे हाल सुरूच
उड्डाणे रद्द, विलंब सुरू असल्यामुळे प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे. व्यवसाय दौरे, वार्षिक परीक्षा, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, तसेच कौटुंबिक कार्यक्रमांना जाणाऱ्या अनेकांना फटका बसला आहे. इंडिगोकडून परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी समस्येची व्याप्ती पाहता हे संकट अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.