जैसलमेर : जैसलमेरमध्ये एसी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली असून यात २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १६ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी होती. प्रवासी जीव वाचवण्यासाठी ओरडत होते. उंच आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत होता. बसमधून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांचा गोंधळ सुरू झाला. मात्र आगीत बसमधील प्रवासी होरपळून गेले. ही आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिली आहेत. दरम्यान, या बसमध्ये फटाक्यांचे सामान असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या जैसलमेर इथून 20 किमी दूर अंतरावर या बसला भीषण आग लागली. बसमध्ये फटाक्यांचं सामान होतं. त्यामुळे आधीच शॉर्ट सर्किट किंवा इंजिनमध्ये बिघाड यामुळे बसमध्ये आग लागली. ती फटाक्यांमुळे संपूर्ण पसरल्याचं सांगितलं जात आहे. मृत व्यक्तींना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. बसमधून फटाके नेण्याची परवानगी नसतानाही कसे घेऊन जात होते यावरही प्रश्नचिन्हं उपस्थित होतं आहे. प्रवाशांना जीव वाचवण्यासाठी पळण्याचा अवधीही मिळाला नाही.
हेही वाचा : Gen Z Protest : मादागास्करमध्ये Gen Z आंदोलन पेटलं! परिणामी राष्ट्रपती देश सोडून पळाले; लष्कराच्या ताब्यात सत्ता
राजस्थानचे मंत्री गजेंद्र सिंह खिमसर यांनी सांगितले की, बसमध्ये ज्या प्रकारे स्फोट झाला आणि बस जळत होती, अशी घटना आयुष्यात कधी पाहिली नाही. बसमधील प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल. आग एवढ्या वेगाने का पसरली, याची चौकशी करण्यासाठी एफएसएल टीम तपास करेल. बसमध्ये फायर सेफ्टीची साधने नव्हती आणि कंप्रेसरचा स्फोट झाल्याने आग अधिक वेगाने पसरली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.