अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले. डीएनए चाचणीनंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. विजय रुपाणी यांच्या निधनाबद्दल गुजरात सरकारने सोमवारी राज्यात एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर केला. आज विजय रुपाणी यांना राजकीय सन्मानाने अंतिम निरोप देण्यात येईल.
राजकोटमधील स्मशानभूमीत करण्यात येणार अंतिम संस्कार -
प्राप्त माहितीनुसार, विजय रुपाणी यांच्यावर आज सायंकाळी 6 वाजता राजकोट येथील रामनाथ पारा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येतील. या दुःखद वातावरणात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मंत्री, अनेक केंद्रीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. माजी मुख्यमंत्र्यांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली आहे. हजारो कार्यकर्ते रुपाणी यांना अंतिम निरोप देण्यासाठी घाटावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मशानभूमी परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा - एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड! हाँगकाँगहून दिल्लीला येणारे विमान परतले
DNA चाचणीद्वारे पटवण्यात येत आहे मृतदेहांची ओळख -
दरम्यान, सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी सांगितले की, अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 92 जणांची डीएनए नमुन्यांद्वारे ओळख पटवण्यात आली आहे. आतापर्यंत 47 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. पीडित कुटुंबियांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाने सुमारे 230 पथके तयार केले आहेत.
हेही वाचा - केदारनाथ हेलिकॉप्टर अपघात प्रकरणी आर्यन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
तथापि, अहमदाबाद विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी देखील अनेक पथके काम करत आहेत. यात अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंग, ब्रिटन, पीएमओ, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, डीजीसीए, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, एटीएस, फॉरेन्सिक, एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेटिंग ब्युरो आणि एअर इंडियासारख्या अनेक संस्थांचा समावेश आहे.