Tuesday, May 20, 2025 02:39:20 PM

पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला : 27 पर्यटकांचा मृत्यू, तीन दहशतवाद्यांचे स्केच प्रसिद्ध

पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे दहशतवादी हल्ला; 27 पर्यटक ठार, LeTशी संबंधित TRFने जबाबदारी घेतली. तीन दहशतवाद्यांची स्केच जाहीर; देशभरात हाय अलर्ट

पहलगाममध्ये  भीषण दहशतवादी हल्ला  27 पर्यटकांचा मृत्यू तीन दहशतवाद्यांचे स्केच प्रसिद्ध

पहलगाम: जम्मू आणि काश्मीरमधील पाहलगाम येथे काल झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 27 निरपराध पर्यटकांचा बळी गेला असून, सुरक्षा यंत्रणांनी तीन दहशतवाद्यांची स्केच जाहीर केली आहेत.मूसा, युनूस आणि आसिफ अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाच्या (LeT) संबंधित असलेल्या 'द रेसिस्टन्स फ्रंट' या गटाने स्वीकारली आहे. सुरक्षादलांनी या अमानुष हल्ल्यामागील कटाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम तीव्र केली आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात सहभागी असलेले तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहेत आणि त्यापैकी किमान दोन परदेशी असल्याचा अंदाज आहे. या दहशतीच्या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली असून, जम्मू-काश्मीरसह दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने काश्मीरचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत बैठक घेतली. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करताना शहा म्हणाले, भारतातील जनतेचा आत्मा कधीही दहशतीसमोर झुकणार नाही. या क्रूर हल्ल्याचे सूत्रधार लवकरच पकडले जातील.
 

जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कांगावा; जबाबदारी नाकारत भारतावर उलटा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या वेळी सौदी अरेबियात होते, मात्र त्यांनी आपला दौरा तात्काळ रद्द करून भारतात परत येत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी म्हटले, या भीषण कृत्यामागे असलेल्यांना शिक्षा होणारच. आमचा दहशतवादाविरोधातील लढा अधिक प्रबळ होईल. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत दिली जात असल्याचेही सांगितले.

हल्ल्यात वाचलेल्या काही पर्यटकांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी धर्म विचारून पुरुष पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. मृतदेहांना त्यांच्या मूळ गावात पाठविण्याची प्रक्रिया सुरु असून, नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान कंपन्यांना भाडेवाढ न करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक घरी परतू शकतील.

देशवासीय शोकसागरात बुडाले असतानाच, सुरक्षा यंत्रणा या क्रूर कटाचा पूर्ण तपास करत आहेत. या हल्ल्यामुळे देशात पुन्हा एकदा दहशतीविरोधात कडवे पाऊल उचलले जात आहे आणि लवकरच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास नागरिकांना दिला जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री