श्रीनगर : पहलगामच्या बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला तेव्हा घोडेस्वार सय्यद हुसेन शाह (Syed Hussain Shah) या तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. काश्मिरी आदरातिथ्याचे उदाहरण सादर करत, त्याने दहशतवाद्यांचा सामना केला आणि त्यांची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अशा प्रकारच्या धैर्यामुळे अनेक पर्यटकांचे प्राण वाचवले. मात्र, या शौर्यात त्याने आपले प्राण अर्पण केले.
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरनमध्ये (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारणा करत मुस्लीम नसलेल्या पुरुषांना ठार मारण्यास सुरुवात केली. तेव्हा सय्यद हुसेन शाह या तरुणाला ते सहन झाले नाही. त्याने काश्मिरी संस्कृतीचे सार आणि काश्मीरच्या आदरातिथ्याची परंपरा याविषयी दहशतवाद्यांना सांगत पर्यटकांना न मारण्यास सांगितले.
हेही वाचा - Pahalgam Attack: 'मला तुझा अभिमान आहे...', विनयची पत्नी हिमांशीचा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील
तो देश-विदेशातून पहलगामला येणाऱ्या पर्यटकांना त्याच्या घोड्यावर बसवून फिरवत असे. यावर तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. सय्यद हुसेन शाह हे पहलगामजवळील अश्मुकाम येथील रहिवासी आहेत. तो पर्यटकांसोबत बैसरणला गेला होता. सय्यद हुसेनने दहशतवाद्यांकडून रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात तो असताना त्याच बंदुकीची गोली लागून त्याचा मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा तो तिथे उपस्थित होता. त्याने दहशतवाद्यांना थांबवले आणि त्यांना सांगितले की, सर्व पर्यटक निर्दोष आहेत. त्यांना मारू नका. हे काश्मिरींचे पाहुणे आहेत. त्यांचा धर्म कोणताही असो. मात्र, दहशतवाद्यांनी त्याचे बोलणे ऐकून त्याला तिथून ढकलून दिले.
सय्यद हुसेन शाहला दुसरे काहीही न सुचल्यामुळे त्याने थेट एका दहशतवाद्यांवर धावून जात त्याची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच दहशतवाद्याच्या रायफलमधून निघालेल्या गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्या आणि तो जखमी अवस्थेत जमिनीवर पडला.
सय्यद हुसेनच्या शौर्यामुळे अनेकांचे प्राण वाचले
इतर जखमींसह त्याला रुग्णालयात नेले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. संध्याकाळी उशिरा शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सय्यद हुसेन शाहचा मित्र बिलाल म्हणाला की, जर सय्यद हुसेनला हवे असते, तर तो आपला जीव वाचवू शकला असता. परंतु, पळून जाण्याऐवजी त्याने दहशतवाद्यांशी लढा दिला. त्याच्या शौर्यामुळे आणि बलिदानामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. जर, त्याने दहशतवाद्यांशी दोन हात केले नसते, तर कदाचित बैसरणमध्ये आणखी लोक मारले गेले असते.
सय्यदचे वडील काय म्हणाले?
जेव्हा आम्हाला दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही आमच्या मुलाला फोन लावला. पण तो कॉल रिसीव्ह केला गेला नाही. तेव्हा आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. नंतर आम्हाला समजले की, आमच्या मुलाला गोळी लागली आहे. हा मुलगा घरातला सर्वांत मोठा होता. तो कमवत असे आणि घर चालवत असे. आमचा मुलगा निर्दोष होता. आम्हाला न्याय पाहिजे. सैय्यदच्या आईची स्थितीही अत्यंत शोकाकुल आहे.
हेही वाचा - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईक 3.0 करणार का? नेटिझन्सकडून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी