जयपूर: आयपीएल 2026 च्या रणसंग्रामात शनिवारी (9 मे 2026) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात पराभवानंतरही एका युवा खेळाडूने त्याच्या फलंदाजीने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्थान रॉयल्सचा उगवता तारा वैभव सूर्यवंशी याने गुजरातविरुद्धच्या सामन्यात मैदानात पाऊल ठेवताच इतिहास रचला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार खेचत वैभवने टी20 क्रिकेटमध्ये त्याचा 100 षटकारांचा टप्पा पूर्ण केला. यासह त्याने जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचे विक्रम मोडीत काढले आहेत.
मैदानात उतरताच जागतिक विक्रमाला गवसणी
वैभव सूर्यवंशी आता टी20 फॉरमॅटमध्ये सर्वांत जलद 100 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने हा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या 514 चेंडूंचा सामना केला. विशेष म्हणजे, त्याने ऑस्ट्रेलियाच्या करणबीर सिंह (813 चेंडू) आणि वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज कीरोन पोलार्ड (843 चेंडू) यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना खूप मागे टाकले आहे. वैभवच्या या झंझावातामुळे क्रिकेट विश्वात त्याच्या नावाची एकच चर्चा रंगली असून, त्याने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
हेही वाचा: GT Vs RR IPL 2026: गुजरात टायटन्स प्ले-ऑफच्या उंबरठ्यावर; शुभमन गिल आणि रशिद खानची वादळी कामगिरी, राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी पराभव
सिराज विरुद्ध वैभव: हाय व्होल्टेज ड्रामा
गुजरात टायटन्सकडून पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या मोहम्मद सिराजच्या पहिल्याच चेंडूवर वैभवने आपली आक्रमक वृत्ती दाखवली. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर सिराजने पुढचा चेंडू अत्यंत भेदक यॉर्कर टाकला, ज्यावर वैभवला स्वतःची दुखापतही सांभाळावी लागली. मात्र, तिसऱ्या षटकात वैभवने पुन्हा सिराजवर हल्ला चढवत तीन चौकार ठोकले. अखेर सिराजने एक वेगवान बाऊन्सर टाकत वैभवला अरशद खानच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. वैभव बाद झाल्यावर सिराजने ज्या पद्धतीने जल्लोष केला, त्यावरून या विकेटचे महत्त्व अधोरेखित झाले.
राजस्थानची झुंज अपयशी, गुजरातचा मोठा विजय
रियान परागच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वालने राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र शुभमन गिल (84) आणि साई सुदर्शन (55) यांच्या फलंदाजीमुळे गुजरातने 229 धावांचा डोंगर उभा केला. या डोंगराचा पाठलाग करताना वैभवने 16 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 36 धावांची वेगवान सुरुवात करून दिली. मात्र, वैभव बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला.
प्ले-ऑफच्या उंबरठ्यावर गुजरात
यशस्वी जयस्वालला केवळ 3 धावा करता आल्यामुळे राजस्थानला मोठी गती मिळाली नाही. अखेर राजस्थानचा संपूर्ण संघ 152 धावांवर गारद झाला आणि गुजरातने 77 धावांनी हा सामना खिशात घातला. या विजयासह गुजरात टायटन्सने गुणतालिकेत पकड मजबूत केली असून त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान आता जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे, पराभवाचा सामना करावा लागला असला तरी वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक रेकॉर्डने राजस्थानच्या चाहत्यांना काहीसा दिलासा दिला आहे.
हेही वाचा: Kharghar Crime: ‘गोल्डनमॅन’ला जिवलग मित्राचाच दगा! सोन्याच्या हव्यासापोटी सिनेस्टाईल दरोड्याचा कट; खारघरमधील धक्कादायक प्रकार उघड