Monday, May 11, 2026 11:56:31 AM

RCB vs MI IPL 2026: विराट-सॉल्टचं वादळ अन् पाटीदारचा तडाखा; आरसीबीने मुंबईला घरच्या मैदानात चारली धूळ

आयपीएल 2026 मधील रोमांचक सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी विजय मिळवला.

rcb vs mi ipl 2026 विराट-सॉल्टचं वादळ अन् पाटीदारचा तडाखा आरसीबीने मुंबईला घरच्या मैदानात चारली धूळ

मुंबई: आईपीएल 2026 मधील 20 व्या सामन्यात Royal Challengers Bengaluru (RCB) ने दमदार कामगिरी करत Mumbai Indians (MI) वर 18 धावांनी मात केली. आरसीबीने दिलेल्या 241 धावांच्या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 20 षटकांत 5 बाद 222 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात सकारात्मक झाली. रयान रिकेल्टन आणि रोहित शर्मा यांनी चांगली लय पकडली होती. मात्र, हॅमस्ट्रिंगमध्ये ताण आल्यामुळे रोहित 19 धावांवर ‘रिटायर्ड हर्ट’ झाला आणि पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकला नाही. रिकेल्टनने 22 चेंडूत 37 धावा करत संघाला चांगली गती दिली.

कर्णधार सूर्यकुमार यादव याला चांगली सुरुवात मिळूनही ती मोठ्या खेळीत रूपांतरित करता आली नाही. त्याने 22 चेंडूत 33 धावा केल्या. तिलक वर्मा केवळ 1 धाव करून बाद झाला. हार्दिक पांड्या याने आक्रमक फलंदाजी करत 22 चेंडूत 40 धावा केल्या, मात्र तो निर्णायक ठरू शकला नाही.

यानंतर शेरफेन रदरफोर्ड याने जबरदस्त फटकेबाजी करत अवघ्या 31 चेंडूत नाबाद 71 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत नऊ षटकारांचा समावेश होता. तरीही त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. गोलंदाजीत आरसीबीकडून सुयश शर्मा याने सर्वाधिक 2 बळी घेतले, तर जेकब डफी याने एक गडी बाद केला.

हेही वाचा: Asha Bhosle Lata Mangeshkar Age Gap: दोन बहिणी, एकच वय! आशा भोसले आणि लतादीदींच्या निधनातील 'तो' विलक्षण योगायोग

त्याआधी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 4 बाद 240 धावा उभारल्या. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. कोहलीने 38 चेंडूत 50 धावा केल्या, तर सॉल्टने 36 चेंडूत 78 धावांची तडाखेबंद खेळी केली.

कर्णधार रजत पाटीदार यानेही आक्रमक फलंदाजी करत केवळ 20 चेंडूत 53 धावा केल्या. शेवटच्या षटकांत टिम डेविड याने 16 चेंडूत नाबाद 34 धावा करत धावसंख्या 240 पर्यंत नेली. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, मिचेल सॅन्टनर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

या विजयासह आरसीबीने हंगामातील तिसरा विजय नोंदवला आहे, तर मुंबई इंडियन्सला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आक्रमक फलंदाजी, मोठ्या धावसंख्या आणि शेवटपर्यंत रंगलेल्या चढाओढीमुळे हा सामना चाहत्यांसाठी अत्यंत रोमांचक ठरला. 

हेही वाचा: MI vs RCB: वानखेडेवर स्वर सम्राज्ञीला सलाम! खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधून वाहिली श्रद्धांजली


सम्बन्धित सामग्री