गुवाहाटी: भारतीय सैन्यावर पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात भारतीय सैन्याच्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी विशेष पूजा करण्यात आली. गुरुवारी रात्री जम्मूमध्ये झालेल्या ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्याचा भारताने कडवे प्रत्युत्तर दिल्यानंतर देशभरातून भारतीय सेनेला पाठिंबा मिळू लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात हजारो भाविकांनी देवीसमोर साकडे घातले की, भारतीय सैन्याला शक्ती आणि यश देवो, पाकिस्तानचा कायमचा खात्मा व्हावा.
या पार्श्वभूमीवर मंदिरात आलेले जयकुमार दास म्हणाले, पाकिस्तानवर अजिबात विश्वास ठेवता येत नाही. आता सहनशक्ती संपली आहे. भारताने अनेकदा शांततेचा मार्ग स्वीकारला, पण पाकिस्तानने प्रत्येक वेळी पाठीत खंजीर खुपसला आहे. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन देशाच्या सुरक्षेसाठी निर्णायक पाऊल उचलावं.
हेही वाचा: इंडियन ऑईल व एसबीआयबाबत अफवांचा पाऊस, अधिकृत खुलासा महत्त्वाचा
दिल्लीहून आलेले शंतनू रॉय म्हणाले, दहशतवादाचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही लढाई सुरू ठेवली पाहिजे. भारतीय सैन्य आमच्या अभिमानाचं प्रतीक आहे. कामाख्या देवी त्यांना शक्ती देवो. या कठीण काळात संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
मंदिरात उपस्थित असलेल्या सुश्मिता रॉय यांनी दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्यू पावलेल्या जवानांच्या कुटुंबांप्रती सहवेदना व्यक्त केली. या दुःखातून सावरण्यासाठी देवी त्यांना बळ देवो. देश चालवताना पंतप्रधानांपासून ते सैनिकांपर्यंत सगळ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. हे आव्हान यशस्वीरीत्या पार करावं, यासाठी देवीचं आशिर्वाद आवश्यक आहे, असं त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात बलोच लिबरेशन आर्मीनेही पाकिस्तानी सैन्यावर मोठे हल्ले चढवले असून, यामुळे पाकिस्तान अंतर्गत अस्थिरतेचा सामना करत आहे. भारताच्या कारवाईसोबतच बलोच बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तान अडचणीत सापडला आहे.
भारताने गुरुवारी रात्री पाकिस्तानच्या आठ क्षेपणास्त्रांना पाडले आणि 50 हून अधिक ड्रोन नष्ट करत पाकिस्तानच्या हल्ल्याचा डाव उधळून लावला. त्यानंतर मध्यरात्री भारतानेही प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या अनेक शहरांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, कामाख्या मंदिरातील ही प्रार्थना हे त्याचेच प्रतीक आहे.