नवी दिल्ली: सध्या देशातील सुरक्षा यंत्रणा युद्धसदृश परिस्थितीमुळे अत्यंत सतर्क आहेत. पाकिस्तानकडून झालेल्या हालचाली आणि मच्छिमारांच्या बोटींवरील ताब्यानंतर भारताने आपली सीमा सुरक्षा अधिक बळकट केली आहे. अशा संवेदनशील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर अफवांचा जोर वाढत चालला आहे. विशेषतः इंधनाचा तुटवडा आणि बँकिंग सेवा बंद होणार असल्याच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे.
गेल्या 24 तासांत सोशल मीडियावर अनेक संदेश व्हायरल होत आहेत, ज्यात इंधनाची टंचाई होणार असल्याचं सांगितलं जातं. काही संदेशांमध्ये तर ‘इंधन संपण्याआधी साठवणूक करा’ असे आवाहन केलं जात आहे. मात्र, इंडियन ऑईलने या अफवांवर स्पष्टपणे खुलासा करत जनतेला शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या अधिकृत निवेदनात सांगितलं आहे की, 'इंडियन ऑईल कडे देशभरात इंधनाचा मुबलक साठा आहे आणि आमच्या पुरवठा लाईन सुरळीतपणे सुरू आहेत. घाबरून खरेदी करण्याची गरज नाही. आमच्या सर्व आउटलेट्सवर इंधन आणि एलपीजी सहज उपलब्ध आहे.'
हेही वाचा:पाकड्यांच्या कुरापती चालूच; पाकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या बोटींवर ताबा
याचसोबत एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) बाबत देखील अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. बँकिंग सेवा बंद होणार, एटीएममधून पैसे निघणार नाहीत, डिजिटल व्यवहार थांबणार अशा स्वरूपाचे मेसेजेस नागरिकांना घाबरवणारे ठरत आहेत. मात्र, एसबीआयनेही आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हे सर्व दावे फेटाळले आहेत. 'आमची सर्व एटीएम, सीडीएमएस/एडीडब्ल्यूएम आणि डिजिटल सेवा पूर्णपणे कार्यरत आहेत आणि सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहेत,' असं एसबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी वाढली असून, काही ठिकाणी बँकांमध्येही लोकांनी मोठ्या प्रमाणात रक्कम काढण्यास सुरुवात केली आहे. पण अशा भीतीच्या वातावरणात चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवणं नागरिकांना आणि व्यवस्थेला दोघांनाही अडचणीत आणू शकतं.
प्रशासनाने, बँकांनी आणि इंधन कंपन्यांनी वेळोवेळी दिलेल्या निवेदनांवर विश्वास ठेवावा. कोणतीही माहिती व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावरून आल्यास ती अधिकृत असल्याची खातरजमा केल्याशिवाय पुढे पाठवू नये.