नवी दिल्ली: पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा, भारतीय वायुदलाने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील 9 दहशतवादी तळांवर अचूक आणि निर्णायक हवाई कारवाई केली. या कारवाईनंतर देशभरात विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर विमानतळावरील सर्वसामान्य हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे.
भारतीय हवाई दलाच्या कारवाईमुळे सीमा भागात तणावाचं वातावरण असून, सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क आहेत. श्रीनगर विमानतळ हा संवेदनशील क्षेत्रात येतो, त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्पुरती हवाई वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये काहीसा गोंधळ असला, तरी सुरक्षा दृष्टीकोनातून हे पाऊल अत्यावश्यक असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा: भारताच्या एअर स्ट्राईकने पाकड्यांची झोप उडवली; शहाबाज शरीफ यांची पोकळ धमकी
एअर इंडियासह अनेक विमान कंपन्यांनी सकाळपासून दुपारी 12 वाजेपर्यंतच्या सर्व उड्डाणांना स्थगिती दिली आहे. या काळात कोणतेही व्यावसायिक किंवा प्रवासी विमान उड्डाण घेणार नाही. यामुळे अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला असून, विमान कंपन्यांनी प्रवाशांना पर्यायी सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. काही उड्डाणं पुढे ढकलण्यात आली आहेत, तर काही रद्द केली गेली आहेत.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सीमारेषेवरच्या सर्व लष्करी तळांवर आणि प्रमुख विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जम्मू-काश्मीरसह दिल्ली, पंजाब आणि राजस्थानमध्येही सुरक्षेचे पातळीवर उच्च उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. श्रीनगर विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून चौकशी आणि गस्त वाढवण्यात आली आहे.
दहशतवाद्यांच्या विरोधात भारत सरकारने घेतलेली ही आक्रमक भूमिका देशातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करत आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने प्रतिक्रियात्मक विधानं दिली असली, तरी भारताची कारवाई ही पूर्णतः लक्ष्यबद्ध आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक होती.
सध्या श्रीनगर विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय तात्पुरता असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत सूचना आणि अपडेट्सकडे लक्ष द्यावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
भारताच्या एअर स्ट्राइकनंतर श्रीनगर विमानतळावर हवाई वाहतूक थांबवण्याचा निर्णय हा केवळ सावधगिरीचा भाग नसून, देशाच्या ठोस सुरक्षा धोरणाचाही भाग आहे.