कोलकाता: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वजण भारत सरकारकडे करत आहेत. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ज्या पद्धतीने कठोर पावले उचलली आहेत त्यामुळे शेजारील देश अस्वस्थ झाला आहे. याच दरम्यान माजी भारतीय क्रिकेट कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या संदर्भात मोठे विधान केले आहे.
पाकिस्तानशी क्रिकेट संबंध पूर्णपणे संपवले पाहिजेत -
पहलगाम हल्ल्यावर बोलताना सौरव गांगुलीने म्हटलं आहे की, 'पहलगाममध्ये जे घडले त्यासाठी कितीही निषेध केला तरी पुरेसा होणार नाही. म्हणून माझ्या मते, आपण पाकिस्तानशी क्रिकेट संबंध पूर्णपणे संपवले पाहिजेत. पाकिस्तानशी असलेले संबंध 100 टक्के तोडले पाहिजेत. कठोर कारवाई आवश्यक आहे. दरवर्षी अशा गोष्टी घडतात हा विनोद नाही. दहशतवाद सहन केला जाऊ शकत नाही.'
हेही वाचा - Unprovoked Firing: काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाक लष्कराचा गोळीबार
भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणाव -
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावामुळे 2012-13 पासून कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळली गेलेली नाही. भारताने शेवटचा आशिया कपसाठी 2008 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. तेव्हापासून, दोन्ही संघ फक्त टी-20 आणि 50 षटकांचा विश्वचषक, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप यासारख्या आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत.
हेही वाचा - 232 प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; काश्मिरातून आतापर्यंत 800 पर्यटक परतले
दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही -
खेळ आणि राजकारण यांची सरमिसळ करू नये असे अनेकदा म्हटले जाते? असा प्रश्न विचारल्यानंतर सौरव गांगुलीने म्हटलं की, 'दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. पाकिस्तानवर कठोर कारवाई आवश्यक आहे.' पहलगाममधील हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध आणखी ताणले गेले आहेत. भारत सरकारने कठोर पावले उचलली आहेत, ज्यात अटारी येथील एकात्मिक चेकपोस्ट बंद करणे आणि पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क व्हिसा सूट योजना स्थगित करणे समाविष्ट आहे.