India AI Impact Summit 2026 : 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) भविष्याबद्दल भारताचा भव्य 'मानव' (MANAV) दृष्टिकोन जगासमोर सादर केला. येत्या काही दशकांत कृत्रिम बुद्धिमत्तेचे व्यवस्थापन मानवी मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून कसे करावे, याची सविस्तर रूपरेषा त्यांनी या समिटमध्ये मांडली. 'AI हे केवळ तंत्रज्ञान नसून ते मानवतेच्या कल्याणासाठी असले पाहिजे,' असा संदेश त्यांनी यावेळी जागतिक धोरणकर्त्यांना दिला.
काय आहे 'MANAV' संकल्पना?
पंतप्रधानांनी AI कडे पाहण्याचा भारताचा दृष्टिकोन स्पष्ट करताना 'MANAV' या शब्दाचे सविस्तर विश्लेषण केले.
M (Moral & Ethical): AI प्रणाली नैतिक आणि मूल्यांवर आधारित असावी.
A (Accountable Governance): जबाबदार प्रशासन, ज्यामध्ये पारदर्शक नियम आणि देखरेख असेल.
N (National Sovereignty): डेटावर त्या त्या राष्ट्राचे सार्वभौमत्व असावे; ज्याचा डेटा त्याची मालकी.
A (Accessible & Inclusive): AI ही कोणाची मक्तेदारी नसून ती सर्वांसाठी सुलभ आणि सर्वसमावेशक असावी.
V (Valid & Verifiable): कोणतीही प्रणाली कायदेशीर आणि सत्यापित असणे अनिवार्य आहे.
जागतिक सुरक्षेसाठी मार्गदर्शक चौकट
पंतप्रधानांच्या मते, 'MANAV' हे केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी एक आवश्यक मॉडेल ठरेल. 21 व्या शतकातील AI-आधारित जगात मानवतेच्या कल्याणासाठी हा दृष्टिकोन एक महत्त्वाचा दुवा बनेल, असे त्यांनी भाकीत केले. तंत्रज्ञानाचा वापर करताना मानवी हक्क आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, यावर त्यांनी विशेष भर दिला.
हेही वाचा - Supreme Court : 'हा लोकशाहीला लागलेला अभिशाप'; घराणेशाहीवरून ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले फ्लॅटचे बेकायदा वाटप
मुलांची सुरक्षा आणि उदयोन्मुख धोके
दैनंदिन जीवनात AI साधनांचा वाढता वापर पाहता, पंतप्रधानांनी मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. सोशल मीडिया आणि AI कंपन्यांवर होणाऱ्या 'डिजिटल व्यसन' निर्माण करण्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी AI स्पेस कुटुंब-अनुकूल आणि सुरक्षित असावी, असे आवाहन केले. "आपण अशा युगात आहोत जिथे मानव आणि बुद्धिमान प्रणाली एकत्र काम करणार आहेत, त्यामुळे सुरक्षा उपायांबाबत आपण अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.