Thursday, February 19, 2026 09:27:05 AM

पाकिस्तान एक निर्लज्ज देश आहे; योगी आदित्यनाथ यांची टीका

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानवर दहशतवादात थेट सहभागी असल्याचा आरोप केला. पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी पाक लष्कर व नेत्यांवर गंभीर टीका केली.

पाकिस्तान एक निर्लज्ज देश आहे योगी आदित्यनाथ यांची टीका

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर कडाडून टीका केली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले की, पाकिस्तान केवळ दहशतवादाला आश्रय देत नाही, तर तो थेट त्यात सहभागी आहे. महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

योगी म्हणाले, 22 एप्रिलला पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. हा हल्ला पाक प्रायोजित दहशतवादाचा भाग आहे आणि याला आता थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ते पुढे म्हणाले, पाक लष्कराचे काही वरिष्ठ अधिकारी आणि नेते दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहतात, हे किती लाजिरवाणे आहे. यावरून स्पष्ट होते की पाकिस्तानची यंत्रणा दहशतवाद्यांना केवळ आश्रय देत नाही, तर त्यांच्याशी सहानुभूतीही बाळगते.

हेही वाचा: भारतीय सैन्यासाठी कामाख्या मंदिरात विशेष पूजा; आसाममधील भाविकांचे साकडे 'पाकिस्तानचा संपूर्ण खात्मा व्हावा'

योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, पाकिस्तान आता संपूर्ण जगात अलग ठेवला गेला आहे. तो मदतीची याचना करत आहे, पण कोणीही त्याच्या बाजूने उभं राहायला तयार नाही. भारताने नेहमीच पाकिस्तानला योग्य उत्तर दिलं आहे आणि भविष्यातही देत राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. आज पाकिस्तान त्याच्या अस्तित्वासाठी झगडतो आहे. दहशतवादाचा पाठिंबा देणाऱ्या देशाचे हेच भविष्य असते, असे ते म्हणाले.

भारताचे शौर्य, निर्णयक्षम नेतृत्व आणि सशक्त लष्करी यंत्रणा यामुळेच आज पाकिस्तानची दयनीय अवस्था झाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघड झाला आहे.
 


सम्बन्धित सामग्री