भारतीय शेअर बाजारात आज बुधवारी दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी जोरदार तेजी पाहायला मिळाली. सुट्टीनंतर सुरू झालेल्या व्यवहारात सेन्सेक्सने 1300 हून अधिक अंकांची उसळी घेत 78200 चा टप्पा ओलांडला, तर निफ्टी 24250 च्या आसपास पोहोचला.
शेअर बाजारातील ही तेजी सर्वच क्षेत्रांमध्ये दिसून आली. विशेषत: मेटल, पीएसयू बँक आणि आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली. आजच्या व्यवहारात इंडिगो, हिंडाल्को आणि श्रीराम फायनान्स हे निफ्टीतील प्रमुख वाढणारे शेअर्स ठरले.
दुसरीकडे डॉ. रेड्डीज, ओएनजीसी आणि कोल इंडिया यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. डॉ. रेड्डीजच्या शेअरमध्ये दोन टक्क्यांहून अधिक घट झाली. बाजारातील तेजीमागे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता.
हेही वाचा: Donald Trump: 'इराणला पुन्हा उभं राहायला 20 वर्षे लागतील'; अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरून अमेरिकेची इराणला मोठी तंबी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन दिवसांत पाकिस्तानमध्ये दोन्ही देशांदरम्यान पुन्हा वाटाघाटी सुरू होऊ शकतात, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतींवर झाला असून ब्रेंट क्रूडचे दर 100 डॉलरच्या खाली आले आहेत.
कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांना मोठा दिलासा मिळतो. तेल स्वस्त झाल्यास महागाई कमी राहण्यास मदत होते, रुपयावरचा दबाव कमी होतो आणि कंपन्यांच्या खर्चातही घट होते. भारतीय रुपयामध्येही आज मजबुती दिसून आली. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि बाजाराला आणखी आधार मिळाला.
याशिवाय, अमेरिकन आणि आशियाई बाजारांमधील तेजीचाही भारतीय बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. डाऊ जोन्स, नॅस्डॅक आणि एस अँड पी 500 निर्देशांकांमध्ये चांगली वाढ झाली. त्याचबरोबर हँग सेंग, निक्केई, तैवान निर्देशांक, कोस्पी आणि स्ट्रेट टाइम्स यांसारख्या आशियाई बाजारांमध्येही तेजी दिसून आली. जागतिक बाजारांमधील या सकारात्मक वातावरणामुळे भारतीय गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!)
हेही वाचा: Road Accident : बस प्रथम वीज खांबावर आदळली, नंतर उलटली; भीषण अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू, तर 15 जखमी