मुंबई : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच अपहरण करून हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारच्यावेळी रस्त्यावरून सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली गेली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दोन पथके तपासासाठी रवाना केली. संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूर घाट रस्त्यावर दहीटना फाटा येथे मिळून आला. मृतदेहावर मारहाणीचे आणि शस्त्रांचे वार असल्याचे स्पष्ट झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरू आहे.
नातेवाईक आणि ग्रामस्थांची आक्रमक प्रतिक्रिया : घटनेची माहिती मिळताच, मस्साजोग येथील नागरिक आणि नातेवाईक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले आहेत. मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा, आरोपीला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेतले जाणार नाही. त्यामुळे, तेथील वातावरण तणावपूर्ण आहे.
पोलिसांचा तपास आणि आरोपांची मागणी :
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर तपासणी सुरू केली आहे, परंतु आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही. स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी पोलिसांवर दबाव आणत आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, "पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आरोपींना अटक करावी आणि नेमके हत्या का घडली याचा शोध घ्यावा," असे म्हटले आहे.
रूग्णालय परिसरात तणाव:
घटनेनंतर, मस्साजोग आणि त्याच्याजवळील परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा वाढवली आहे. बीड जिल्ह्यातील ही घटना धक्कादायक असून, त्यावर सखोल तपास सुरू आहे. पुढील तपासानंतरच या घटनेचे नेमके कारण समोर येऊ शकते.