ED Action on Anil Ambani: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीशी संबंधित फसव्या बँक हमी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत तिसरी अटक केली आहे. ही कारवाई तब्बल 68 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या तपासाचा एक भाग आहे. ईडीने अमर नाथ दत्ता यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) अंतर्गत ताब्यात घेतले असून, त्यांना विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
याआधी दोन जण अडचणीत
या प्रकरणात यापूर्वी ईडीने रिलायन्स पॉवरचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) अशोक कुमार पाल, आणि ओडिशा येथील बिस्वाल ट्रेडलिंक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) पार्थ सारथी बिस्वाल यांना अटक केली होती. या दोघांवर बनावट बँक हमी सादर करण्यात सहभाग असल्याचा आरोप आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
ईडीच्या चौकशीनुसार, हे प्रकरण रिलायन्स एनयू बेस लिमिटेड या रिलायन्स पॉवरच्या उपकंपनीशी संबंधित आहे. कंपनीने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECI) कडे 68.2 कोटी रुपयांची बँक हमी सादर केली होती. चौकशीत ही हमी फसवी आणि बनावट असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित कंपनी पूर्वी महाराष्ट्र एनर्जी जनरेशन लिमिटेड या नावाने ओळखली जात होती.
हेही वाचा - Gold-Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा झळाळी; चांदीही झाली महाग, आजचे दर जाणून घ्या
ईडीचे गंभीर आरोप
ईडीच्या मते, बिस्वाल ट्रेडलिंक कंपनी बनावट बँक हमी पुरविणाऱ्या रॅकेटमध्ये सामील होती. हे रॅकेट विविध व्यावसायिक गटांना आठ टक्के कमिशनवर बनावट हमी देत होते. ईडीचा दावा आहे की या प्रकरणाद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग करण्यात आले. दरम्यान, रिलायन्स ग्रुपने या प्रकरणापासून स्वतःला अलिप्त ठेवले आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, अनिल अंबानी गेल्या 3.5 वर्षांपासून रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या बोर्डावर नाहीत आणि त्यांचा या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नाही.
हेही वाचा - Public Banks Merger Plan: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत; पुन्हा होणार बँकांचे विलीनीकरण, आरबीआयशी चर्चा सुरू
प्रकरणाची पार्श्वभूमी
ही चौकशी नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झाली होती. दिल्ली पोलिसांच्या Economic Offences Wing (EoW) ने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीने मनी लाँड्रिंगचा स्वतंत्र खटला दाखल केला. तेव्हापासून ईडी सतत या रॅकेटचा मागोवा घेत असून, ही तिसरी अटक या चौकशीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.