Sunday, February 09, 2025 04:05:03 PM

Inauguration of Mission Mausam by Prime Minister
पंतप्रधानांच्या हस्ते मिशन मौसमचे उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभाग घेतला.

पंतप्रधानांच्या हस्ते मिशन मौसमचे उद्‌घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभाग घेतला.

भारतीय हवामान विभागाचा दीडशे वर्षांचा प्रवास हा केवळ एका विभागाचा प्रवास नसून भारतातील आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आहे. असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय हवामान विभागाने या दीडशे वर्षांमध्ये लाखो भारतीयांची सेवा केली असून ही संस्था भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतीक बनले आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. भारतीय हवामान विभागाची यशोगाथा सांगणाऱ्या एका विशेष टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे देखील आज अनावरण झाले, असे ते म्हणाले. 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल तेव्हा आय एम डी च्या भविष्याची रूपरेषा देणारे आयएमडी व्हिजन -2047 हे पत्रक देखील जारी करण्यात आले. आयएमडीच्या 150 वर्षांच्या कारकिर्दीच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

भारतीय हवामान विभागाने आपल्या दीडशे वर्षपूर्तीनिमित्त देशातील युवकांनाही या कार्याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय हवामान विषयक ऑलिंपियाडचे आयोजन केले होते, याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. या ऑलिंपियाडमध्ये हजारो मुलांनी भाग घेतला आणि भविष्यात त्यांची हवामानशास्त्रातील आवड आणखी वाढेल, असे ते म्हणाले. थोड्या वेळापूर्वी प्रदर्शनात युवकांशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख करून त्यांनी या समारंभात सहभागी झालेल्या तरुणाईला शुभेच्छा दिल्या.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

 

भारतीय हवामान विभागाची स्थापना 15 जानेवारी 1875 रोजी म्हणजे मकरसंक्रांतीच्या अगदी लगेचच झाली असे सांगून पंतप्रधान म्हणाले की भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीला असलेले महत्व आपण सर्वजण जाणतोच. गुजरातचे नागरिक असल्याने आपला सर्वात आवडता सण मकर संक्रांत असायचा, असे त्यांनी सांगितले.

मकर संक्रांत म्हणजे या दिवसापासून सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते आणि त्याला उत्तरायण म्हणून ओळखले जाते. हा कालावधी उत्तर गोलार्धातील सूर्यप्रकाशात हळूहळू वाढ दर्शवतो, ज्यामुळे शेतीच्या कामांची लगबग सुरू होते, असे ते म्हणाले. भारतात मकर संक्रांत हा सण उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेपासून पश्चिमेकडे विविध सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा केला जातो. या मंगलपर्वानिमित्त पंतप्रधानांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

 

हेही वाचा : वाल्मिक कराडसंदर्भात मोठी बातमी; केज कोर्टाने काय निर्णय दिला?

 

देशाच्या वैज्ञानिक संस्थांमधील प्रगती त्या देशाची विज्ञानाविषयीची जागरुकता दर्शवते" असे पंतप्रधानांनी सांगितले. वैज्ञानिक संस्थांमधील संशोधन आणि नवोन्मेष हे नवीन भारताच्या प्रवृत्तीचा भाग आहेत, गेल्या दहा वर्षात आय एम डी ची पायाभूत सेवासुविधा आणि तंत्रज्ञानात अभूतपूर्व विस्तार झाला आहे, डॉपलर हवामान रडार, स्वयंचलित हवामान केंद्रे, धावपट्टी हवामान निरीक्षण प्रणाली आणि जिल्हानिहाय पर्जन्य निरीक्षण केंद्रांच्या संख्येत लक्षणीय वाढ करून, या सर्वांची सुधारणा करण्यात आली आहे. अंतराळ आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा लाभ भारतातील हवामानशास्त्राला झाला आहे. अंटार्क्टिकामध्ये मैत्री आणि भारती नावाच्या भारताच्या दोन हवामान वेधशाळा आहेत आणि गेल्या वर्षी, सुपर कॉम्प्युटर आर्क आणि अरुणिका देशाला समाप्रित करण्यात आले, ज्यामुळे आय एम डी ची विश्वासार्हता आणखी वाढली, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताला कोणत्याही प्रकारच्या हवामानासाठी सज्ज करुन हवामानाप्रती सजग असे स्मार्ट राष्ट्र बनवण्यासाठी मिशन मौसम योजना सुरु केली असून, शाश्वत भविष्य आणि भविष्यासाठी आवश्यक सज्जतेच्या दिशेने असलेल्या भारताच्या वचनबद्धतेचे ते प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विज्ञानाची समर्पकता ही नवनवीन शिखरे गाठण्यात नसून सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यात आहे, यावर त्यांनी भर दिला. हवामानाशी संबंधित अचूक माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवून या निकषांवर आय एम डी ने आपले स्थान अधिक उंच केले आहे. ‘सर्वांसाठी पूर्व चेतावणी’ उपक्रमाचा लाभ आता 90% पेक्षा जास्त लोकसंख्येला मिळतो आहे, कोणीही गेल्या दहा दिवसांतील आणि आगामी 10 दिवसांची हवामानविषयक माहिती कधीही पाहू शकतो , हवामान खात्याचे अंदाज व्हॉट्सॲपवर देखील उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.

मेघदूत मोबाईल ऍप द्वारे हवामानासंबंधित माहिती स्थानिक भाषांमधून दिली जाते. दहा वर्षांपूर्वीपर्यंत फक्त 10 टक्के शेतकरी हवामानाच्या अंदाजांचा वापर करत होते, पण आता हा आकडा 50 टक्क्यांवर पोचला आहे. विजा पडण्यासंबंधींची माहिती आता मोबाईल ऍप द्वारे मिळू शकते असे त्यांनी सांगितले. पूर्वी समुद्रावर मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या लाखो मच्छीमारांच्या कुटुंबियांना काळजीने ग्रासले जात होते, मात्र आता त्यांना भारतीय हवामान खात्याकडून वेळोवेळी इशारे मिळत असतात, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या अद्ययावत सूचनांमुळे कृषी व नील (सागरी) अर्थव्यवस्थेतील सुरक्षा राखली जाते, ते म्हणाले.देशाच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेसाठी हवामानशास्त्राचे महत्व निर्विवाद आहे”, असे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीचे विपरीत परिणाम लवकर कमी करण्यासाठी हवामानशास्त्राची अचूकता वाढवली पाहिजे असे त्यांनी सांगितले. भारताला हे महत्व पूर्णपणे ज्ञात होते, त्यामुळे एकेकाळी अपरिहार्य वाटणाऱ्या आपत्तीचे व्यवस्थापन आता खूपच सुधारले आहे. कच्छ मधील कांडला इथे 1998 साली व ओडिशात 1999 साली झालेल्या चक्रीवादळामुळे हजारो लोकांना प्राण गमवावे लागल्याच्या प्रसंगांची आठवण त्यांनी करून दिली. त्या तुलनेत नुकत्याच कोसळलेल्या अशा आपत्तीमधील जीवितहानी अतिशय कमी झाली असल्याचे त्यांनी म्हटले.

 

 

हेही वाचा : शक्तिपीठ महामार्गाला फडणवीसांचा हिरवा कंदील

 

यात हवामान खात्याचे योगदान खूप महत्वाचे होते असे ते म्हणाले. विज्ञान आणि पूर्वतयारीची सांगड घातल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळले व त्यायोगे अर्थव्यवस्थेची लवचिकता वाढून गुंतवणूकदारांचा भरवसा वाढला, असे ते म्हणाले. वैज्ञानिक प्रगती तसेच तिचा पुरेपूर वापर ही जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा सुधारण्याची गुरुकिल्ली ठरू शकते , असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या हवामान खात्यातील सुधारणांमुळे आपत्ती व्यवस्थापन क्षमताही सुधारल्याचे त्यांनी सांगितले. अचानक येणाऱ्या पुराचा अंदाज वर्तवण्याच्या भारताच्या प्रणालींकडून नेपाळ, भूतान, बांगलादेश व श्रीलंकेला देखील माहिती पुरवली जाते असे ते म्हणाले. भारत नेहमीच विश्व बंधू या भूमिकेतून इतर देशांना आपत्तीकाळात मदत पुरवण्यात अग्रेसर राहिल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा सुधारली असून यामध्ये भारतीय हवामानखात्याच्या शास्त्रज्ञाची महत्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री