Leopard Attack in Satara : सातारा जिल्ह्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असतानाच एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. दिवंगत अजित पवार यांच्या गटाच्या नेत्याच्या मुलावर बिबट्याचा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. उंडाळे-शेवाळवाडी मार्गावर हा हल्ला झाला असून, यामुळे कराड तालुक्यात भीतीचे सावट पसरले आहे. वडिलांच्या प्रचारासाठी फिरत असताना या तरुण नेत्याला अचानक अनपेक्षित संकटाने घेरले. मात्र, हा भयंकर प्रकार दुखापतीवर निभावला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुका गेल्या 4 वर्षांपासून रखडल्या होत्या आणि आता कुठे निवडणुकांची धामधूम सुरू झाली असतानाच या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
दबा धरून बसलेला बिबट्या अन् अचानक झेप
ज्येष्ठ काँग्रेस नेते दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांचे नातू आणि अजित पवार गटाचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे पुत्र अधिराज पाटील यांच्यावर बिबट्याने भीषण हल्ला केला. अधिराज पाटील हे त्यांचे सहकारी धनाजी पाटील यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत होते. उंडाळे-शेवाळवाडी रस्त्यावरून जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर झेप घेतली. या हल्ल्यात अधिराज यांच्या पायाला बिबट्याचा दात लागून दुखापत झाली आहे. सुदैवाने, दुचाकी चालवणारे धनाजी पाटील या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हल्ल्यानंतर अधिराज यांना तातडीने उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. पुढील काही दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा - Parth Pawar : टेंशन कायम! पार्थ पवार यांना क्लिनचीट नाही; अहवाल सादर करण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ
प्रचाराचा उत्साह आणि अनपेक्षित संकट
अधिराज यांचे वडील उदयसिंह पाटील-उंडाळकर हे सध्या येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. अधिराज हे आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी फिरत होते. विशेष म्हणजे, या घटनेच्या काही वेळ आधीच एका प्रचारसभेत त्यांनी "आपण आता सत्ताधारी पक्षात आहोत, प्रलंबित असलेली रस्त्यांची आणि ग्रंथालयांची कामे आता निधी आणून पूर्ण करू" असे आश्वासन दिले होते. प्रचार आटोपून घराकडे परतत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली, मात्र नशिबाने ते मोठ्या संकटातून वाचले. मात्र, राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सातारा जिल्ह्यात एका बड्या नेत्याच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे आता वन विभागावर दबाव वाढला आहे.
उंडाळे परिसरात दहशतीचे वातावरण
या घटनेमुळे उंडाळे आणि परिसरात बिबट्याची दहशत प्रचंड वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्यांचा वावर वाढला असून, आता तो थेट माणसांवर हल्ले करू लागल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर उपाय म्हणून काही नागरिकांनी बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी केली आहे, तर वन्यजीव प्रेमींनी याला विरोध दर्शवला आहे. वन विभागाने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी आता उंडाळकर समर्थकांकडून आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.
हेही वाचा - पडकं घर..., जंगली जनावरांचा वावर...; 'त्या' निराधार आजीबाईला मंत्री शंभूराजे देसाईंनी बांधून दिलं पक्क घर, आजीने दिला भरभरून आशीर्वाद