उपमुख्यमंत्री असलेल्या शिंदे यांच्यासाठी ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरं अतिशय महत्त्वाची आहेत. राजकारणातील प्रभाव कायम ठेवण्यासाठी बालेकिल्ले राखणं शिंदे यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे. कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदे यांनी भाजपला काल जोरदार धक्का दिला. त्यानंतर अवघ्या २४ तासांत भाजपला दुसरा झटका बसला आहे.युतीला बहुमत मिळालं असलं तरीही दोन्ही पक्षांनी महापौर आणि अन्य समित्यांमध्ये वरचष्मा ठेवण्याच्या हेतूनं अन्य पक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु केले.
आज नशिबाचे फासेदेखील त्यांच्या बाजूनं पडले.श्रीकांत शिंदे कल्याणचे खासदार आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रविंद्र चव्हाण डोंबिवलीचे आमदार आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीचं महापौरपद दोघांसाठी प्रतिष्ठेचा होता. केडीएमसीमध्ये युतीत लढल्यानंतरही शिवसेनेनं मनसेचा पाठिंबा मिळवत संख्याबळ वाढवत महापौरपदावरील दावा मजबूत केला.
काल श्रीकांत शिंदे यांनी आकड्यांची जुळवाजुळव करत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना धक्के दिले. त्यानंतर आज नशिबाचे फासे चव्हाण यांच्या विरोधात गेले. कल्याण-डोंबिवली महापालिकेचं महापौर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झालं. पालिकेत अनुसूचित जमातीचे केवळ ३ नगरसेवक आहेत. यातील २ शिंदेसेनेकडे, तर १ मनसेकडे आहे.
आकड्यांची जुळवाजुळव करुन चव्हाण महापौरपद खेचून आणतील अशी शक्यता वाटत असताना श्रीकांत शिंदे यांनी मनसेला सोबत घेत पहिला धमाका केला.ठाण्यातील महापौरपद शिंदेसेनेकडे जाणार हे निश्चित आहे. तर नशिबाचे फासे फिरल्यानं कल्याण-डोंबिवली महापालिकेतही शिंदेसेनेचाच महापौर होईल. त्यामुळे ठाण्यातील दोन प्रमुख महापालिका शिंदेसेनेकडे राहणार हे निश्चित आहे.