Bhurikavathe to Tolnur road (47 km) widening Details : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी विकासाची मोठी भेट दिली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-B च्या रुंदीकरणासाठी अखेर केंद्राने हिरवा कंदील दाखवला असून, यासाठी तब्बल 353 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेला जोडणारा हा मार्ग आता अधिक गतिमान आणि सुरक्षित होणार आहे.
रस्त्याचे रुंदीकरण आणि नवीन पूल
सोलापूर जिल्ह्यातील भुरीकवठे - वागदरी - अक्कलकोट - नागणसूर - तोळणूर ते महाराष्ट्र-कर्नाटक राज्यसीमा या 47.663 किमी लांबीच्या सेक्शनचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. सध्या 7 मीटर रुंदीचा असलेला हा रस्ता आता 12 मीटरचा होणार आहे. या प्रकल्पामध्ये वागदरी येथे स्वतंत्र बाह्यवळण मार्ग (बायपास) आणि सांगवी येथे नवीन पुलाच्या बांधकामाचाही समावेश आहे. महामार्ग विभागाने 4 महिन्यांपूर्वी पाठवलेल्या प्रस्तावाला फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. पावसाळ्यापूर्वी प्राथमिक कामे आटोपल्यास या भागातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल.
हेही वाचा - Kolhapur Panchaganga Bridge : पंचगंगा नदीवर 913 कोटींचा सहा पदरी ''पिलर'' उड्डाणपूल; नितीन गडकरींनी कोल्हापूरकरांना दिलं मोठं गिफ्ट
आंतरराज्यीय वाहतुकीला मिळणार चालना
हा महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. सध्या हा रस्ता अरुंद असल्याने पावसाळ्यात आणि जड वाहतुकीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. आता 353.23 कोटी रुपयांच्या तरतुदीमुळे कर्नाटककडून येणारी अवजड वाहतूक अधिक सुरक्षित होईल. यामुळे दोन्ही राज्यांमधील व्यापाराला गती मिळण्यासोबतच प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या वाचणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे एका वर्षाच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
अक्कलकोट स्वामी समर्थ भक्तांसाठी मोठी सोय
नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, या नव्या मार्गामुळे लातूर, उमरगा तसेच आंध्र प्रदेशातून येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सुलभ होणार आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने या मार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने सोलापूरच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होईल.
हेही वाचा - Pune news : पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! औंध-खडकी ट्रॅफिकसाठी ''गडकरी प्लॅन'' तयार; उड्डाणपूल की भुयारी मार्ग?