मुंबई : रोहित पवार यांनी आज, मंगळवारी अजित पवार यांच्या अकाली निधनाबाबत अनेक मुद्द्यावर धक्कादायक खुलासे केले. एका पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी विमान दुर्घटनेचे प्रत्येक टप्पे समोर आणले. यातच रोहित पवार यांनी अजित पवार हे पाण्याच्या पास्टिक बाटलीवरून काचेच्या बाटलीवर का आले, याबाबतही सांगितले. प्लास्टिकच्या बाटलीत सिरींज खुसवून सहज एखाद्याचा काटा काढला जाऊ शकतो, या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधले. याची कुणकूण बहुदा अजित पवार यांना लागली असावी. त्यामुळे त्यांनी काचेच्या बाटलीचा वापर करण्यास सुरूवात केली असावी, असे रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा : AI Regulation : AI जनरेटेड कंटेंटवर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आता करावं लागणार 'या' नियमांच पालन, अन्यथा...
काय म्हणाल्या सुषमा अंधारे
आ. रोहित पवार यांनी आज घेतलेली पत्रकार परिषद महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे.
पत्रकार परिषदेतले अनेक धक्कादायक खुलासे विशेषता शेवटच्या स्लाईडवर प्लास्टिक बाटली मधून पाणी पिणारे दादा काचेच्या बाटली वर का आले ? हे सांगताना त्यांनी बाटलीमध्ये ज्या पद्धतीने सिरींज घुसवली ही कृती न बोलता ही महाराष्ट्राच्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देणारी आहे.
गेल्या आठ दिवसांपासून मी जे सांगतेय नेमकी तीच मागणी रोहित पवार यांनी केली त्याबद्दल आभार.
"...खरोखरच हा तपास आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनच व्हायला हवा."
कुठल्याही व्यक्ती किंवा पक्ष याबद्दल आम्हाला कसलेही अंगुलीनिर्देश करायचे नाहीत. मात्र या मागणीच्या आड येत जर कोणी हा तपास थांबवण्याचा प्रयत्न करेल किंवा त्या अनुषंगाने एखादे वक्तव्य करेल तर मात्र त्यांच्या हेतू वर निश्चितपणे महाराष्ट्राच्या मनात शंका उपस्थित होईल...!
हेही वाचा : Amol Mitkari : 'अजित पवारांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करा'; अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अकाली निधनामुळे सर्वांवरच शोककळा पसरली होती. दरम्यान, त्यांच्या निधनाबाबत अनेक शंका कुशंकादेखील उपस्थित केल्या जात आहेत. हा अपघात होता की घातपात, असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले. अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनीदेखील दादांच्या निधनानंतर दहा दिवस पूर्ण झाल्यानंतर सविस्तर बोलणार असे सांगितले होते. त्यानुसार आज, मंगळवारी रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांसमोर अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबतचा सविस्तर तपशील पीपीटीच्या माध्यमातून मांडला. यातून त्यांनी राज्यभरातून उपस्थित होणाऱ्या काही प्रश्नांचे निरसन केले. तर काही प्रश्न नव्याने उपस्थित केले.