Railway News : भारतीय रेल्वेच्या अजब कारभाराचा एक न भूतो न भविष्यती असा प्रकार समोर आला असून, यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबलपूर स्थानकावर प्रवासी रेल्वेची वाट पाहात होतो.. ट्रेन आली सुद्धा.. पण ज्या डब्यात त्यांचे आरक्षण होते तो डब्बाच गायब असल्याचे पाहून प्रवाशांच्या पायाखालची जमीन सरकली. हातात कन्फर्म तिकीट असतानाही बसायला डबाच नसल्याने प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर एकच संताप व्यक्त केला.
57 प्रवाशांचा खोळंबा आणि प्रचंड गोंधळ
संबलपूर-नांदेड एक्स्प्रेस (गाडी क्र. 20809) मध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासी मोठ्या उत्साहाने स्थानकावर पोहोचले होते. मात्र, जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागली, तेव्हा प्रवाशांना धक्काच बसला. या ट्रेनला एक 'एसी थ्री-टियर' कोच जोडलेलाच नव्हता. ज्या 57 प्रवाशांचे या बेपत्ता डब्यात कन्फर्म बुकिंग होते, त्यांची एकच धावपळ उडाली. तिकीट असूनही डब्बा नसल्याने वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे अतोनात हाल झाले. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.
हेही वाचा - Most Expensive Number Plate: भारतातील सर्वात महाग नंबर प्लेट! ‘DDC 0001’ साठी तरुणाने खर्च केले तब्बल 2.08 कोटी रुपये
तांत्रिक बिघाडाचा रेल्वेचा दावा
हा अभूतपूर्व गोंधळ उघडकीस आल्यानंतर ईस्ट कोस्ट रेल्वेच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, तांत्रिक बिघाडामुळे तो विशिष्ट आरक्षित डब्बा ट्रेनला वेळेवर जोडता आला नाही. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तातडीने अतिरिक्त टीटीई (TTE) तैनात करण्यात आले. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म होते, त्यांना ट्रेनमधील इतर डब्यांमधील रिक्त जागांवर तात्पुरते सामावून घेण्याची कसरत रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली. रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि स्थानक कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सामानासह दुसऱ्या डब्यात चढण्यासाठी मदत केली.
विशाखापट्टणममध्ये अखेर मिळाला दिलासा
सुरुवातीचा काही तासांचा प्रवास प्रवाशांना अत्यंत दाटीवाटीने आणि गैरसोयीचा करावा लागला. मात्र, रेल्वेने तातडीने हालचाली करून विशाखापट्टणम स्थानकावर एका पर्यायी डब्याची व्यवस्था केली. ट्रेन विशाखापट्टणम येथे पोहोचल्यानंतर तिथे नवीन डबा जोडण्यात आला आणि मगच या 57 प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. प्रवाशांची सुविधा हीच आमची प्राथमिकता आहे, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला असला तरी, ऐन प्रवासाच्या वेळी चक्क डबाच जोडायला विसरण्याच्या या प्रकारामुळे रेल्वेच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.
हेही वाचा - Sports Budget 2026: खेळाडूंना जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! बजेट 2026 मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी दोन महत्त्वाचे निर्णय