Nitesh Rane: भाजप आमदार नितेश राणे यांनी परप्रांतीयांनी आणि कट्टरपंथीयांना चांगलेच धारेवर धरले आहे. "परप्रांतीयांनी राज ठाकरे यांना शिव्या देऊ नयेत," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच, महाराष्ट्रातील काही भागांतील बदलत्या लोकसंख्येवर भाष्य करताना त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. "तुम्ही कधी पुण्याच्या कोंढवा भागात गेला आहात का? तिथे हिंदू शोधण्यासाठी आता दुर्बीण लावावी लागते," असे खळबळजनक विधान राणे यांनी केले आहे.
2047 पर्यंत 'इस्लामी राष्ट्र' बनवण्याचे षडयंत्र?
नितेश राणे यांनी राज्यातील काही विशिष्ट भागांचा उल्लेख करत सुरक्षेच्या मुद्द्यावर लक्ष वेधले. ते म्हणाले की, "आमच्या देशाला 2047 पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून काही भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. यामध्ये मालेगाव, नया नगर (मीरा रोड) आणि मुंबईतील काही भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये जे काही चालले आहे, त्याबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडलेली भूमिका अगदी योग्य आहे. 'हिरव्या सापांच्या' माध्यमातून जो काही प्रयत्न सुरू आहे, त्याचे सत्य सांगण्याचे काम माझ्या सहकाऱ्यांनी केले असून माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे."
मराठी भाषेचा आग्रह आणि हिंसेवर टीका
राज ठाकरे यांच्या संदर्भात बोलताना राणे यांनी स्पष्ट केले की, कोणालाही शिवीगाळ करणे अत्यंत चुकीचे आहे. "मराठी भाषेचा आग्रह धरलाच पाहिजे, यात दुमत नाही. मात्र, हा आग्रह धरताना हिंसा कशाला? आणि ही हिंसा फक्त हिंदूंवरच का? कधी मोहम्मद अली रोड, नल बाजार, मालेगाव, भिवंडी किंवा नया नगरमध्ये जाऊन असा आग्रह धरून दाखवा, मग बघा हे 'हिरवे साप' कसे वळवळ करतात," असे आव्हानही त्यांनी दिले.
हेही वाचा - Narhari Zirwal Video : नरहरी झिरवाळ यांचा 'त्या' व्हिडिओवर मोठा खुलासा; हिंगोलीच्या प्रश्नांवरही थेट भाष्य
मराठी शाळा आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर भाष्य
यावेळी नितेश राणे यांनी मराठी शाळा आणि भाषेच्या मुद्द्यावरून विरोधकांवरही निशाणा साधला. नाना पटोले यांच्या विधानांचा समाचार घेताना त्यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले. "मराठी शिकवा आणि मराठी शाळा टिकवा, हीच आमची भूमिका आहे. आम्ही निश्चितपणे लवकरच मराठी शिकवणे अधिक प्रभावीपणे सुरू करू," असेही त्यांनी शेवटी नमूद केले.