मुंबई : “अपघातानंतरची धावपळ नव्हे, अपघात होऊच नये हीच खरी शहाणपणाची दिशा,” या विचाराला मूर्त रूप देत केंद्र सरकारने वाहतूक सुरक्षेबाबत ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. देशात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर सन 2027 पासून नव्या व्यावसायिक जड वाहनांमध्ये ‘ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स’ (Advanced Driver Assistance Systems, ADAS) तंत्रज्ञान अनिवार्य करण्यात येणार आहे. सुरक्षिततेकडे झेपावणाऱ्या भारतीय वाहन उद्योगासाठी हा बदल निर्णायक मानला जात आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडेजवळील टाकवे येथे ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (The Automotive Research Association of India, ARAI)ने देशातील पहिले समर्पित ADAS चाचणी केंद्र सुरू केले आहे. या केंद्राच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ARAIचे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मते, 2027 पासून बाजारात येणाऱ्या नव्या व्यावसायिक वाहनांमध्ये पाच अत्यावश्यक ADAS वैशिष्ट्ये अनिवार्य असतील.
या निर्णयाचा आवाका केवळ ट्रक आणि बसपुरता मर्यादित नाही. इतर चारचाकी वाहनांमध्येही ADAS तंत्रज्ञान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला असून, त्यासंदर्भातील अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. वाहन उत्पादक कंपन्यांसाठी ही केवळ तांत्रिक अट नसून, सुरक्षेच्या नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे.
हेही वाचा: Railway Train Delay: रेल्वेचा ‘लेटलतीफ’ कारभार; तेजस एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना उशिर, प्रवाशांना संताप अनावर
या पाच वैशिष्ट्यांमध्ये ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (AEB), ड्रायव्हर ड्राउझीनेस डिटेक्शन, ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि मूव्हिंग ऑब्जेक्ट डिटेक्शन यांचा समावेश आहे. अचानक समोर अडथळा आल्यास स्वयंचलित ब्रेक लावणे, चालकाला झोप येत असल्याची सूचना देणे किंवा वाहनाच्या अंध कोनातील हालचाल ओळखणे यांसारखी प्रणाली अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करण्यात प्रभावी ठरणार आहेत. मोठ्या वाहनांच्या आसपास न दिसणाऱ्या वस्तूंमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी ही तंत्रे विशेष उपयुक्त ठरणार आहेत.
प्रत्यक्ष रस्त्यांवरील विविध परिस्थिती चाचणी केंद्रात कृत्रिमरीत्या पुन्हा निर्माण करून संवेदक आणि संगणकीय प्रणालींची कसून तपासणी केली जाते. ADAS प्रणालींची अचूकता आणि कार्यक्षमता तपासण्यासाठी ARAIने देशातील रस्ते मार्ग, निवडक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग तसेच काही शहरी भागांमध्ये डेटा संकलन वाहने नेमली आहेत. या वाहनांद्वारे दिवस-रात्र, पाऊस, धुके आणि तीव्र उन्हात व्हिडिओ, रडार आणि GPS माहिती जमा केली जाते.
सन 2027 पासून लागू होणारा हा नियम भारतीय वाहन उद्योगाला जागतिक सुरक्षामानकांच्या दिशेने नेणारा टप्पा ठरेल. “सावध रहा, सुरक्षित रहा” या संदेशाला तांत्रिक आधार देत भारत रस्ते सुरक्षेच्या नव्या पर्वात प्रवेश करत असल्याचे या निर्णयातून स्पष्ट होत आहे.
हेही वाचा: Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमध्ये दोन गटात गँगवॉर; जुन्या वादातून तुफान राडा, तर गोळीबारात एकाचा मृत्यू