शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांत अदानी समूहाला देशातील महत्त्वाचे उद्योग बहाल केल्याचा गंभीर आरोप केला होता. यात 2014 पूर्वी देशाच्या नकाशावर मर्यादित असलेल्या अदानींचे साम्राज्य भाजपच्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत कसे पसरले, याचे एक विशेष प्रेझेंटेशन त्यांनी मांडले. त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही काळापूर्वी खुद्द गौतम अदानी यांनी राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो शेअर करत साटम यांनी राज यांच्या भूमिकेला 'ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस' असे संबोधले आहे. त्यानंतर आता काल झालेल्या ठाण्यातील सभेतून राज ठाकरेंनी भाजपने शेअर केलेल्या फोटोवर उत्तर दिलं आहे.
हेही वाचा- BMC Election 2026: शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराला बॉलिवूडची अभिनेत्री उतरली थेट मैदानात; शिवसैनिकांची अलोट गर्दी
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, "मी अदानींवर केलेल्या टीकांमुळे काही जणांना खूप मिरच्या झोंबल्या आहेत. दोन वर्षांआधीचा वैगरे हा फोटो असेल. जेव्हा अदानी माझ्या घरी येऊन गेले होते. घरी आल्यावर मी काय हाकलून देऊ का? माझ्या घरी गौतम अदानीही येऊन गेले, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेले, अंबानी, आनंद महिंद्राही येऊन गेले. म्हणून काय त्यांची पापं झाकायची का मी? ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट येईल, ज्यावेळी मुंबई-ठाणे यांसारख्या आमच्या शहरांवर संकट येईल. राज ठाकरे दोस्ती वगैरे बघणार नाही. एक विमानतळ आणि एक पोर्टसोडून अदाणींचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव आणि मोदींचं नाव याच्या जोरावर हा माणूस देशभर पसरत गेलाय."