पुणे : राज्यात अनधिकृत शाळांचे पेव वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या तपासणीत राज्यभरातील तब्बल 487 बेकायदा शाळा आढळून आल्या असून, त्यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 381 शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने 76 शाळा बंद करण्याची कारवाई केली असून 111 शाळांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर 325 शाळांकडून दंडही वसूल करण्यात आला आहे. शासनाची मान्यता नसतानाही सुरू असलेल्या या शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा : PM Modi On Energy Crisis: ‘ पुढील 4 वर्षे सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेल...'; मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा मोठा इशारा
मुंबई विभागात राज्यात सर्वाधिक अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. मुंबईत तब्बल 389 शाळा अनधिकृत असून त्यातील 59 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर 96 शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 310 शाळांना दंड लागू केला आहे. त्यापैकी पाच शाळांकडून दंडवसुली करण्यात आली आहे. पुणे विभागातील 63 अनधिकृत शाळांपैकी 11 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सात शाळांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय दहा शाळांकडून दंडवसुली करण्यात आली आहे. तर नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये अनधिकृत शाळा असताना त्या शाळांवर अद्याप कारवाईचा बडगा उगारण्यात आला नसल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येते.