बारामती: बारामती जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात आज एका नव्या अध्यायाची नांदी होणार होती. दिवंगत अजित पवार यांनी रिक्त केलेल्या चेअरमन पदावर आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. तांत्रिक कारणास्तव, म्हणजेच निवडणूक निर्णय अधिकारी आजारी असल्याने अधिकृत निवड प्रक्रिया काही काळ पुढे ढकलली असली, तरी सुनेत्रा पवार यांची या पदावर नियुक्ती होणे आता केवळ औपचारिकता उरली आहे. 'ब' वर्ग गटातून बिनविरोध निवडून येत सुनेत्रा वहिनींनी माळेगावच्या धुरा सांभाळण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.
सोमवारी माळेगाव कारखान्याच्या चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही निवड प्रक्रिया तहकूब करण्यात आली. जरी आज ही निवड अधिकृतरीत्या जाहीर झाली नसली, तरी माळेगावच्या मातीतील भक्ती आणि शक्तीचा वारसा सुनेत्रा पवार समर्थपणे चालवतील, असा विश्वास नीलकंठेश्वर पॅनेलच्या समर्थकांमध्ये दिसून येत आहे. अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना ज्या उंचीवर पोहोचला, तीच गती कायम राखण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्यासमोर असेल.
'दादां'ची शिस्त आणि पहाटेचा तो फोन
यावेळी भावूक होत सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवारांच्या कामाच्या पद्धतीचा उल्लेख केला. "गेली अनेक वर्षे मी जवळून पाहिले आहे की, दादांची सकाळ कारखान्याच्या एमडीला फोन केल्याशिवाय होत नसे. कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि कारखान्याच्या प्रत्येक बारकाव्यावर असलेले त्यांचे लक्ष हेच माळेगावच्या यशाचे गमक आहे," असे त्या म्हणाल्या. कारखान्याशी त्यांची 'तोंडओळख' जुनी असली, तरी आता प्रत्यक्ष कारभाराची जबाबदारी घेताना त्यांनी नम्रपणे कबुली दिली की, जरी सखोल तांत्रिक माहिती नसली, तरी सहकाऱ्यांच्या साथीने आपण माळेगावला प्रगतीच्या शिखरावर नेऊ.
हेही वाचा: Israel vs Iran War: पश्चिम आशियात महायुद्धाचा वणवा; इस्रायल, अमेरिका, इराण पाठोपाठ आता 'या' देशाची एन्ट्री
स्वप्न देशात 'नंबर एक' होण्याचे!
अजित पवारांचे स्वप्न होते की, माळेगाव कारखाना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अग्रगण्य आणि आदर्श कारखाना व्हावा. याच स्वप्नाचा धागा पकडून सुनेत्रा पवार म्हणाल्या, "निलकंठेश्वर पॅनेलवर सभासदांनी जो विश्वास टाकला, तो सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दादांनी जे व्हिजन समोर ठेवले आहे, ते पूर्ण करण्यासाठी मी माझ्या परीने शंभर टक्के प्रयत्न करेन. शेतकरी, कामगार आणि सभासद या सर्वांच्या कल्याणासाठी जे जे करणे शक्य आहे, ते सर्व आम्ही मिळून करू."
राजकीय वारसा आणि नव्या जबाबदाऱ्या
बारामतीच्या राजकारणात सुनेत्रा पवार या नेहमीच पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावत आल्या आहेत. मात्र, माळेगावच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्ती होणे, हे त्यांच्या सक्रिय प्रशासकीय प्रवासातील एक मोठे पाऊल मानले जात आहे. अजित दादा उपमुख्यमंत्री असतानाही त्यांनी ज्याप्रमाणे कारखान्याकडे बारकाईने लक्ष दिले, तीच परंपरा पुढे नेण्याचे आश्वासन सुनेत्रा पवारांनी दिले आहे. "माझ्याकडून कुणालाही न आवडणारी गोष्ट घडणार नाही, याची मी पूर्ण खबरदारी घेईन," हा त्यांचा शब्द सभासदांना दिलासा देणारा ठरला आहे.
हेही वाचा: Strait of Hormuz Crisis: जगाची ऊर्जा लाइफलाइन धोक्यात! इराणच्या कठोर पावलाने तेलबाजारात खळबळ, दर गगनाला भिडणार?