Thursday, February 12, 2026 04:16:13 PM

BMC Election: मुंबईत सत्ता कुणाची? अमराठी-उत्तर भारतीय मतदार, धर्म-जात समीकरण आणि मराठी मतांचा निर्णायक खेळ

75 हजार कोटींच्या बीएमसीसाठी निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. मराठी–अमराठी संघर्ष, धार्मिक व जातीय समीकरणे आणि सत्ताधारी गटांतील लढत यामुळे मुंबईची महापालिका निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

bmc election मुंबईत सत्ता कुणाची अमराठी-उत्तर भारतीय मतदार धर्म-जात समीकरण आणि मराठी मतांचा निर्णायक खेळ

BMC Election: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची धामधूम शिगेला पोहोचली असून गुरुवारी, 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. मात्र या सगळ्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने. सुमारे 75 हजार कोटी रुपयांचे बजेट असलेली बीएमसी आणि तिचे 227 वॉर्ड हे सध्या राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.

मुंबईतील ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित नसून, ती मराठी विरुद्ध अमराठी, सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी आणि धार्मिक–जातीय समीकरणांची कसोटी ठरणार असल्याचे चित्र आहे. विशेषतः ‘मराठी माणूस’ हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येताना दिसतो आहे. ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली असून, मुंबईतील पारंपरिक मतदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

मुंबईची लोकसंख्या आणि धार्मिक रचना

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सुमारे 1.87 कोटी लोकसंख्या असून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाची (MMR) लोकसंख्या अंदाजे 2.7 कोटींच्या आसपास आहे. धार्मिक रचनेचा विचार केला तर मुंबईत सुमारे 67 टक्के हिंदू, 18 टक्क्यांहून अधिक मुस्लिम, 4 टक्के जैन आणि जवळपास 4 टक्के ख्रिश्चन समाज आहे. याशिवाय शीख, पारशी आणि इतर समुदायही शहराच्या सामाजिक रचनेचा महत्त्वाचा भाग आहेत.

227 वॉर्ड आणि राजकीय आघाड्या

बीएमसीच्या 227 प्रभागांमध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) आणि मनसे यांची युती झाली असून, गेली दोन दशके मुंबई महापालिकेवर असलेला शिवसेनेचा प्रभाव टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करून सत्तेवर आपली पकड मजबूत करण्याचे धोरण आखले आहे.

मराठी मतदारांचा प्रभाव

मुंबईत आजही मराठी मतदारांचे प्रमाण सुमारे 25 ते 30 टक्के आहे. 2017 च्या बीएमसी निवडणुकीत निवडून आलेल्या 227 नगरसेवकांपैकी जवळपास 150 हून अधिक मराठी भाषिक होते. दादर, परळ, लालबाग, गिरगाव, गिरणी कामगार वसाहती आणि जुने निवासी भाग हे मराठी मतदारांचे बालेकिल्ले मानले जातात. त्यामुळे ठाकरे बंधूंसह शिंदे गटानेही ‘मराठी अस्मिता’ या मुद्द्यावर जोर दिला आहे.

अमराठी आणि उत्तर भारतीय मतदार

मुंबईत 20 ते 25 टक्के उत्तर भारतीय मतदार असून त्यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. कांदिवली, गोरेगाव, मालाड, घाटकोपर, कुर्ला आणि मीरा-भाईंदर भागात त्यांचा प्रभाव दिसतो. भाजप या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असून, काँग्रेसही या वर्गाकडे दुर्लक्ष करताना दिसत नाही.

धार्मिक-जातीय समीकरणांचा प्रभाव?

या निवडणुकीत धार्मिक आणि जातीय समीकरणे अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकू शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. शेवटच्या टप्प्यात प्रचाराची दिशा बदलून ध्रुवीकरणाचे मुद्दे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकूणच, बीएमसी निवडणूक ही केवळ महापालिकेच्या सत्तेसाठी नसून, मुंबईच्या राजकीय भवितव्याची दिशा ठरवणारी लढाई ठरणार आहे. मराठी विरुद्ध अमराठी, जुनी निष्ठा विरुद्ध नवे समीकरण आणि सत्ताधारी गटांतील संघर्ष या सगळ्याचा निकाल मतदारांच्या हातात आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या