Wednesday, May 14, 2025 11:38:57 PM

बुलढाण्याच्या केसगळतीला आता धक्कादायक वळण

बुलढाणा जिल्ह्यात केस गळती झालेल्या गावात आता नवीन आजाराने डोकेवर काढले आहे. केस गळतीनंतर चक्क लोकांच्या बोटांची नखे गळायला लागली आहे.

बुलढाण्याच्या केसगळतीला आता धक्कादायक वळण

प्रफुल खंडारे,प्रतिनिधी, बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात केस गळती झालेल्या गावात आता नवीन आजाराने डोकेवर काढले आहे. केस गळतीनंतर चक्क लोकांच्या बोटांची नखे गळायला लागली आहे. बोंडगावसह चार गावात तब्बल 29 जणांचे नख गळतीचे प्रकरण समोर आले आहेत.  

केस गळतीने बाधित शेगाव तालुक्यातील अनेक गावातील लोकांना टक्कल पडले होते. त्यावर प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आय सी एम आर आणि एम्स सारख्या संस्थांचे संशोधक या संपूर्ण प्रकरणावर संशोधन करायला आले होते. या संपूर्ण प्रकरणात लोकांचे केस, त्वचा, रक्त एवढेच नाही तर गावातील पाणी आणि धान्याचे देखील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यानंतर या केस गळती प्रकारात रुग्णांच्या शरीरात वाढलेले सेलेनियम असल्याचं सांगण्यात आलं. मात्र याबाबतचे रिपोर्ट अद्याप जाहीर करण्यात आले नाहीत. सेलेनियम रुग्णांच्या शरीरात आलं कसं याबाबत कोणीही ब्र शब्द काढायला तयार नाही. बोंड गावातील बेबाबाई इंगळे यांना गेल्या आठ दिवसापासून आता नख गळतीचा त्रास सुरू झाला आहे. गावात बहुतांश लोकांना ज्यांना केस गळती झाली होती. त्यांना या नख गळतीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. मात्र बोंड गावातील बेबाबाई इंगळे यांना केस गळती झालेली नव्हती. तरीही त्यांना आता नख गळतीच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. या नख गळतीमुळे बोटांमध्ये ठणक येऊन अंगात ताप भरत असल्याचे बेबाबाई सांगतात.

हेही वाचा : हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज ठाकरेंचा विरोध

बोंडगावसह परिसरातील चार गावात आतापर्यंत नख गळतीचे एकूण 29 रुग्ण नोंदवले गेले असल्याचं आरोग्य यंत्रणेकडून सांगितलं जात आहे. या नख गळतीमागे देखील शरीरात वाढलेलं सेलेनियमच असल्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे. केस गळतीपासून संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणारे गावाचे सरपंच रामा थारकर यांनी संपूर्ण नख गळती प्रकरणी संबंधित यंत्रणेला तातडीने माहिती दिली. जिल्हा आरोग्य यंत्रणेसह स्थानिक डॉक्टर देखील गावात दाखल झाले आहेत. मात्र शरीरात वाढलेलं सेलेनियमचं मुख्य स्त्रोत आहे हे सांगण्यात स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीवरच्या आरोग्य यंत्रणांना अपयश आल्याचं पाहायला मिळतं आहे.

केस गळतीच्या या संपूर्ण प्रकरणावर जय महाराष्ट्रने वेळोवेळी पाठपुरावा करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यापैकीच आयसीएमआरने केस गळती प्रकरणी आतापर्यंत आपला संशोधन अहवाल लपवून का ठेवला असा प्रश्न सातत्याने जय महाराष्ट्र वाहिनीने उपस्थित केला होता. हा अहवाल वेळीच जाहीर करून रुग्णांच्या शरीरात वाढत असलेलं सेलेनियमयुक्त गहू ताब्यात घेऊन नष्ट केले असते तर नख गळतीच्या प्रकरणापर्यंत हे प्रकरण येऊन पोहोचलं नसतं. शरीरात अचानकपणे वाढ झालेल्या सेलेनियममुळे हा संपूर्ण गंभीर आजार गावकऱ्यांना जडत आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या धान्यातून सेलेनियम गावकऱ्यांच्या शरीरात जातं आहे ते धान्य तातडीने ताब्यात घेऊन नष्ट करा. अन्यथा एखाद्याचा जीव गेला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी येथील बेजबाबदार यंत्रणांची असेल. 


सम्बन्धित सामग्री