Friday, May 16, 2025 01:42:58 PM

जातनिहाय जनगणना; निर्णयाचं दानवेंकडून स्वागत...विरोधकांवर हल्लाबोल

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं रावसाहेब दानवे यांनी स्वागत केलं; विरोधकांवर केली टीका , सत्तेत असताना का नाही घेतला निर्णय?

जातनिहाय जनगणना निर्णयाचं दानवेंकडून स्वागतविरोधकांवर हल्लाबोल

जालना: केंद्र सरकारने नुकताच घेतलेला जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला असून, त्यांनी यापूर्वी सत्तेत असताना जातीय जनगणना का केली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले, जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतला असून, हा निर्णय देशाच्या सामाजिक वास्तवाच्या अधिक जवळ जाणारा आहे. विरोधक सत्तेत असताना मग ते इंदिरा गांधी, मनमोहनसिंह किंवा एच.डी. देवगौडा यांच्या सरकारात असोत त्यांनी कधीही जातनिहाय जनगणनेचा विचार केला नाही.

ते पुढे म्हणाले, आज जे विरोधक जातनिहाय जनगणनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनीच त्यांच्या काळात या मागणीला विरोध केला होता. आता त्याच विरोधकांनी या निर्णयाचं स्वागत करत स्वतःचा चेहरा वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हेही वाचा: सांगलीत भरदिवसा धूम स्टाईल चोरी : 40 तोळ्यांचे दागिने लंपास

राहुल गांधी यांना सवाल
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. जातनिहाय जनगणना आमची संकल्पना होती, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. यावर उत्तर देताना दानवे म्हणाले, जर ही संकल्पना राहुल गांधी यांची होती, तर त्यांच्या सरकारच्या काळात त्यांनी ती राबवली का नाही? त्यांच्या विचाराचे पंतप्रधान असताना त्यांनी का ही मागणी ठामपणे मांडली नाही? 

दानवे यांनी स्पष्ट केलं की, आमचं सरकार कुठलाही निर्णय घेण्याआधी विरोधकांना विचारत नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे नव्हे, तर समाजाच्या हितासाठी आणि वास्तव समजण्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे.

संजय राऊत यांनाही टोला
 उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना दानवे म्हणाले, संजय राऊत यांचे वक्तव्य आता हसण्यासारखे झालं आहे. ते बिचारे काय बोलतील, याचं काही नेमकं सांगता येत नाही. राऊत यांनी म्हटलं होतं की, जातनिहाय जनगणनेचा निर्णय मोदी सरकारचा असला तरी त्याचा श्रेय राहुल गांधी यांना जातं. यावर दानवे यांनी रोखठोक शब्दात प्रत्युत्तर दिलं की, प्रत्येक चांगल्या निर्णयाचं श्रेय घ्यायचं आणि जबाबदारी मात्र झटकायची, हीच विरोधकांची शैली आहे.

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपा सरकारने घेतलेला हा निर्णय सामाजिक समतेच्या दिशेने एक पाऊल असल्याचे भाजपचे म्हणणे असले तरी, विरोधक मात्र त्यावरून श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात असल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
 


सम्बन्धित सामग्री