VIP Flight Security : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर खडबडून जागी झालेल्या महायुती सरकारने आता सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या हवाई ताफ्यातील वाहनांची देखभाल आणि तातडीच्या दुरुस्तीसाठी 6 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) आज प्रसिद्ध करण्यात आला.
अपघातानंतर तातडीची पावले
अजित पवार यांच्या निधनानंतर सरकारी प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याच पार्श्वभूमीवर सरकारने प्रलंबित असलेल्या निधीला तात्काळ मंजुरी दिली आहे. हा निधी दोन भागांत विभागला असून प्रत्येकी 3 कोटींच्या दोन पुरवणी मागण्यांना अर्थ विभागाने मंजुरी दिली आहे. विमानांचे सुटे भाग, अत्यावश्यक यंत्रसामग्री खरेदी आणि लहान बांधकामे तसेच तांत्रिक दुरुस्तीसाठी हा पैसा वापरला जाईल.
हिवाळी अधिवेशनातील मागणीवर शिक्कामोर्तब
डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात या निधीची मागणी करण्यात आली होती. वित्त विभागाच्या 'व्यय अग्रक्रम समिती'ने आता या खर्चावर शिक्कामोर्तब केल्याने हवाई ताफ्यातील विमानांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. हा सर्व खर्च 'अनिवार्य' श्रेणीत ठेवण्यात आला असून, तो 2025-26 या चालू आर्थिक वर्षातच पूर्ण करावा लागणार आहे.
निधीचा विनियोग कसा होणार?
राज्य सरकारने या शासन निर्णयाद्वारे मंजूर केलेल्या एकूण 6 कोटी रुपयांच्या निधीची विभागणी प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या कामांसाठी केली आहे. यातील पहिला 3 कोटी रुपयांचा निधी 'तांत्रिक साधनसामग्री' या प्रवर्गासाठी राखून ठेवण्यात आला आहे. या निधीचा वापर सरकारी ताफ्यातील विमानांचे महत्त्वाचे सुटे भाग (Spares) आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेली अत्यावश्यक यंत्रणा खरेदी करण्यासाठी केला जाईल, जेणेकरून विमानांच्या उड्डाणात कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. उर्वरित 3 कोटी रुपयांचा निधी 'बांधकाम व दुरुस्ती' या कामासाठी विनियोगात आणला जाणार आहे. हा पैसा हवाई वाहनांशी संबंधित असलेल्या तळांवरील किरकोळ बांधकामे, हँगरची देखभाल आणि इतर तांत्रिक दुरुस्तीच्या कामांवर खर्च केला जाईल. सरकारी हवाई ताफ्यातील विमानांची आणि हेलिकॉप्टर्सची वेळोवेळी होणारी ही तांत्रिक देखभाल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Death : पवार कुटुंबियांसाठी कठीण क्षण! जड अंतःकरणाने केलं बारामतीत अजितदादांच्या अस्थीचं नीरा नदीत विसर्जन
सुरक्षा व्यवस्थेचे सक्षमीकरण
सरकारी हवाई ताफ्याची देखभाल वेळेवर व्हावी आणि तांत्रिक बिघाडामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळता यावी, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. अजित पवारांच्या अपघातानंतर या कामांना आता युद्धपातळीवर गती दिली जाणार आहे.