बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार, 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने राज्यासह देशात हळहळ व्यक्त होत आहे. अजितदादांच अपघाती निधन हे पवार कुटुंबियांसह साऱ्या राज्याला चटका लावून जाणारं आहे. दादा आपल्यात नाहीत, यावर अजुनही विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. अशातच गुरुवार, 29 जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर आज, 30 जानेवारी रोजी सकाळी त्यांचे अस्थी संकलन केल्यानंतर दुपारी बारामतीतील नीरा नदीमध्ये हे अस्थी विसर्जन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार, दोन्ही मुलं पार्थ आणि जय, त्यांची सून, अजितदादाचे बंधू, बहिण सुप्रिया सुळे, पुतणे युगेंद्र पवार आणि इतर कुटुंबिय बोटीत उपस्थित होते. अतिशय भावूक होऊन अजितदादांच्या अस्थी नीरा नदीत विसर्जित करण्यात आल्या.
हेही वाचा : ठरलं! उद्याच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार?, राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुनेत्राताईंची निवड
सध्या राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सभा घेण्यासाठी अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीला निघाले होते. सकाळी विमानातून प्रवास करताना बारामतीमध्ये बँडिंगच्या वेळी अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात घडला. यावेळी त्यांच्यासोबत असलेले सर्व प्रवासी जागीच मृत्युमुखी पडले. अजित पवार, दोन पायलट, एक विमान अटेडेंट आणि अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक या पाच जणांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. तर गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंदासह राज्यातील विविध पक्षातील मंत्री, नेते उपस्थित होते. तसेच अजित पवारांना राजकारणात बोट धरून चालण्यास शिकवणारे त्यांचे काका शरद पवार हेदेखील भावविवष अवस्थेत यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांची दोन्ही मुलं पार्थ आणि जय यांनी त्यांचा मुखाग्नी दिला. तर शुक्रवारी सकाळी अजितदादांच्या अस्थीचे संकलन या दोघींनी केले. यावेळीदेखील शरद पवार यांनी उपस्थिती दर्शवली. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या अस्थी नीरा नदीत विसर्जित करण्यात आल्या.