Captain Shambhavi Pathak : बारामतीतील विमान अपघातात केवळ महाराष्ट्राने आपला एक मोठा नेता गमावला नाही, तर एका कर्तबगार महिला वैमानिकाचे स्वप्नही धुराड्यात विरून गेले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांनी उड्डाणापूर्वी पहाटे 6:34 वाजता आपल्या आजीला पाठवलेला एक व्हॉट्सॲप मेसेज आता त्यांच्या आयुष्यातील शेवटची आठवण ठरला आहे.
'तो' मेसेज आणि आजीचा कातर स्वर
ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या शांभवीच्या आजी मीरा पाठक यांनी अश्रूंच्या धारा रोखत या आठवणींना उजाळा दिला. शांभवी त्यांना 'दादी' नाही तर प्रेमाने 'दद्दा' म्हणायची. "हाय दद्दा, गुड मॉर्निंग," असा मेसेज शांभवीने बुधवारी पहाटे पाठवला होता. आजी सांगतात की, "शांभवी सहसा मेसेज किंवा कॉल करायची नाही. पण त्या दिवशी तिला माझी आठवण कशी झाली कोणास ठाऊक? मी 'गुड मॉर्निंग चिनी' म्हणून रिप्लाय दिला, पण तो तिचा शेवटचा संदेश असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं."
रक्तातच होतं विमान उडवण्याचं धाडस
शांभवीच्या कुटुंबाचा भारतीय हवाई दलाशी जवळचा संबंध आहे. तिचे आजोबा किशन पाठक हे हवाई दलात विंग कमांडर होते, तर वडील विक्रम पाठक हे ग्रुप कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. ग्वाल्हेर आणि दिल्लीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर शांभवीने न्यूझीलंडमधून व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवला होता. तिने रशिया, लंडन आणि दिल्लीतही विमान चालवण्याचा अनुभव घेतला होता.
हेही वाचा - Praful Patel : "आता आपली भेट होणार नाही," अजितदादांचा 'तो' शेवटचा फोन ठरला अखेरचा संवाद
कर्तव्यदक्ष नात आणि हुशार वैमानिक
गेल्या वर्षी आजोबांच्या निधनानंतर शांभवी आपल्या आजीला धीर देण्यासाठी 13 दिवस सोबत राहिली होती. अलीकडेच तिने मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आजीसोबत वेळ घालवला होता. 28 वर्षांच्या या तरुण वैमानिकाने अतिशय कमी वयात डीजीसीएचे (DGCA) कठीण लायसन्स मिळवून स्वतःची ओळख निर्माण केली होती.
पोरकं झालं वसंत विहारचं घर
ग्वाल्हेरमधील वसंत विहार येथील मीरा पाठक यांच्या घरात आता केवळ शांभवीच्या आठवणी उरल्या आहेत. सकाळी 8 वाजता वडिलांचा रडत आलेला फोन आणि त्यानंतर दोन तासांनी मिळालेली मृत्यूची बातमी, या धक्क्यातून पाठक कुटुंब अजून सावरलेले नाही. एका ध्येयवेड्या मुलीचा कॉकपिटपर्यंतचा प्रवास असा अनपेक्षितपणे संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.