Konkan Railway Viral Video: कोकण रेल्वे ही कोकणच्या विकासाची वाहिनी मानली जाते, मात्र याच रेल्वेतून प्रवास करताना स्थानिक मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर नुकताच एक संतापजनक प्रकार घडला, जिथे कन्फर्म तिकीट खिशात असतानाही एका प्रवाशाला चक्क गाडीत शिरू दिले गेले नाही. रेल्वेच्या या सावळागोंधळामुळे कोकणी प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, "आपल्याच मातीत आम्हाला दुय्यम वागणूक का?" असा सवाल विचारला जात आहे.
परप्रांतीयांची अवैध गर्दी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
संबंधित प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी स्थानकावर गाडी आली असता संपूर्ण डबा अवैध गर्दीने आणि परप्रांतीयांनी व्यापलेला होता. आरक्षित डब्यात पाय ठेवायलाही जागा नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे, रेल्वे प्रशासनाकडे दाद मागितली असता मदत मिळण्याऐवजी 10-12 रेल्वे पोलिसांनी येऊन प्रवाशालाच गुन्हेगारासारखी वागणूक दिली. भररात्री हक्काचे तिकीट असूनही प्रवास करता आला नाही, ज्यामुळे प्रवाशाचे पैसे आणि वेळ तर वाया गेलाच, पण त्यांना प्रचंड मानसिक त्रासही सहन करावा लागला.
रेल्वेच्या 'सुरक्षित प्रवासा'च्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षेच्या दाव्यांमधील फोलपणा उघड झाला आहे. जर कन्फर्म तिकीट असलेला प्रवासी सुरक्षितपणे डब्यात शिरू शकत नसेल, तर रेल्वे प्रशासनाचा अवाढव्य डोलारा काय कामाचा? वास्को-द-गामा – पटणा एक्सप्रेसमधील या प्रकारामुळे आता प्रवाशांकडून काही रोखठोक प्रश्न विचारले जात आहेत. त्या दिवशी ड्युटीवर असणारे TC कोण होते? अनाधिकृत प्रवाशांकडून किती दंड वसूल करण्यात आला? तिकीट असूनही प्रवाशाला चढू न देण्यास जबाबदार कोण?
हेही वाचा - Ahilyanagar Crime: आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; मंत्रोच्चाराने आजार बरा करण्याचा दावा, संगमनेर हादरलं
प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी
कोकण रेल्वेतील हा प्रकार केवळ एका प्रवाशापुरता मर्यादित नसून, हा मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि सन्मानाचा प्रश्न बनला आहे. रेल्वे पोलीस आणि टीसी यांच्या कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी कोकणी जनतेकडून होत आहे. आता रेल्वे प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.