Thursday, May 22, 2025 06:56:10 PM

कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा; कर्जतकरांची केंद्रिय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

कर्जत स्थानकात लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा, या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन दिले.

कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा कर्जतकरांची केंद्रिय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

कर्जत: कर्जत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल्वेगाडी शनिवारी पुण्याच्या दिशेने जात असताना काही तांत्रिक कारणांमुळे कर्जत स्थानकावर काही काळ थांबविण्यात आली. ही संधी साधून स्थानिक भाजप कार्यकर्ते आणि काही सामाजिक संस्थांनी मंत्र्यांचे स्वागत करून त्यांना निवेदन दिले.

या निवेदनात लॉकडाऊनपूर्वी कर्जत स्थानकात थांबणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्यांचे थांबे अचानक बंद करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे थांबे पुन्हा सुरू करण्यात यावेत, अशी मागणी यामध्ये करण्यात आली. विशेषतः कर्जत, खोपोली, मोहपाडा, रसायनी, बदलापूर, अंबरनाथ या भागातील प्रवाशांना प्रवासासाठी कल्याणपर्यंत जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात. जर कर्जत स्थानकात एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला, तर या संपूर्ण परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

Maharashtra HSC Result 2025 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निकालाची तारीख जाहीर

तसेच, कर्जत हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असून माथेरानकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी कर्जत हे एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. कर्जत स्थानकात एक्सप्रेस गाड्यांचा थांबा दिल्यास पर्यटकांची संख्याही वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. हॉटेल, लॉजिंग, टुरिझम गाइड यांसारख्या व्यवसायांनाही याचा फायदा होईल. यामुळे रोजगारनिर्मिती होऊन स्थानिक विकास साधला जाऊ शकतो.

रेल्वे मंत्र्यांकडे देण्यात आलेल्या निवेदनात हे सर्व मुद्दे मांडले गेले असून, केंद्र सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही स्थानिकांची मागणी ऐकून घेतली असून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कर्जतकरांच्या या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळतो का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.


सम्बन्धित सामग्री