मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून सभागृहात शेतकरी प्रश्नांवरून वातावरण काही काळ तणावपूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वतंत्र चर्चा घेण्यात यावी, असा प्रस्ताव सभागृहात मांडला.
या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांनी मांडलेला मुद्दा गंभीर असल्याचे नमूद केले. इतर प्रस्तावांना दालनात परवानगी नाकारत असतानाच ते भूमिका स्पष्ट करत होते. मात्र याचवेळी मंत्री धनंजय मुंडे अचानक सभागृहातून बोलू लागल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत, “मुंडे साहेब, आपण सत्तारूढ पक्षाचा भाग आहात. अशा पद्धतीने यावर बोलणे उचित नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
हेही वाचा: PM Vishwakarma Yojana: कारागीरांना मिळणार मोठं पाठबळ; पंतप्रधान विश्वकर्मा योजनेबाबत नवीन अपडेट समोर, कोणाला मिळणार लाभ?
त्यावर धनंजय मुंडे काहीसे संतप्त होत म्हणाले की, “अध्यक्ष महोदय, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर माझा मुद्दा आहे. मला माझे मत मांडू द्या. मी विरोधकांना अडवत नाही, फक्त अध्यक्षांसमोर माझी भूमिका मांडत आहे.”
यानंतर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत सभागृहातील शिस्तीवर भाष्य केले. “अलीकडे सभागृहात कोणीही कधीही उठून बोलत आहे, हे योग्य नाही. सुरू असलेले कामकाज पूर्ण होऊ द्या. त्यानंतर तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल,” अशी तंबी त्यांनी धनंजय मुंडे यांना दिली.
तसेच शेतकऱ्यांचा विषय महत्त्वाचा असल्यामुळे विजय वडेट्टीवार यांना बोलण्याची संधी देण्यात आल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले. मात्र प्रत्येक वेळी प्रस्ताव नाकारल्यानंतरही त्यावर सतत बोलणे योग्य नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
अध्यक्षांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर सभागृहात काही काळ शांतता पसरली आणि पुढील कामकाज सुरळीतपणे सुरू करण्यात आले.
हेही वाचा: Kolhapur-Mumbai Flight : कोल्हापूर-नवी मुंबई विमान प्रवास आता फक्त तासाभरात; 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा