राज्यातील तरुणांसाठी एक मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आता पोलीस भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ही भरती मोहीम पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांसाठी हा एक उत्तम करिअरचा मार्ग ठरू शकतो.
रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात एकूण 108 रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर जळगाव जिल्ह्यात तब्बल 171 पदांसाठी भरती होणार आहे. दोन्ही जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना भरतीविषयक सर्व माहिती संबंधित पोलीस विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर सहज मिळेल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लगेच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. या भरतीसाठी दोन टप्प्यांत परीक्षा घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 गुणांची शारीरिक चाचणी होईल, ज्यामध्ये उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाईल. त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी केली जाईल. म्हणजेच, शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे गरजेचे आहे.
हेही वाचा: NOC Rule Change: दिल्लीमध्ये जुन्या वाहनांसाठी NOC वरची वेळेची अट काढली; डिझेल आणि पेट्रोल वाहनांसाठी मिळणार ही नवीन सवलत
शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचं झालं तर, किमान 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच बारावी किंवा पदवीधर विद्यार्थ्यांनाही ही संधी खुली आहे. जर उमेदवारांनी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतले असेल, तर गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे. या संधीसाठी वयोमर्यादा आणि आरक्षणाचे निकष शासनाच्या नियमांनुसार असतील. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे योग्य आणि अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक गुणपत्रिका, वयाचा पुरावा, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवासी व बोनाफाईड प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. जर उमेदवार खेळाडू असतील, तर त्यांचे खेळाडू प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. तसेच महिलांसाठी असलेल्या 30 टक्के आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रमाणपत्र आवश्यक आहे.
भरतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे उमेदवारांना घरबसल्या अर्ज करता येतो. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज करताना माहिती अचूक भरणे, आवश्यक कागदपत्रे योग्य प्रकारे अपलोड करणे आणि वेळेत अर्ज सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
हेही वाचा: Maharashtra Government: सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी IAS प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती स्थापन